मस्तानी, इतिहासात, मराठी
मुलखात, तुझी वाईट प्रतिमा रंगवणाऱ्यांनी तुझी बुद्धिमत्ता, तुझा प्रणामीपंथाचा वारसा,
तुझे शौर्य, तुझी मुत्सद्दी वृत्ती, बाणेदारपणा, उदारवृत्ती, प्रामाणिकपणा या गुणांना
झाकून ठेवले. प्रणामीपंथाचे थोर साधू मस्ताना यांचे स्मरण म्हणून तुझे वडील छत्रसाल
यांनी तुझे नाव मस्तानी ठेवले. सुरुवातीचे तीन वर्षे तुझा संसार नीट चालला. तुला समशेर
हा मुलगा झाला अन पेशवे कुटुंबात वादाची वादळे उठू लागली. त्यासाठी तुझ्या बदनामीचा
घाट घातला गेला. तुला रखेल ठरवण्यापर्यंत मजल गेली. तुला दारुडी ठरवले गेले. खरे म्हणजे
तुला रखेल ठरवणारे त्यांच्या स्त्रियांना तरी कुठे पुरुषांच्या बरोबरीचे मानत होते?
आदरणीय मस्तानी, एक मराठी
माणूस म्हणून हे पत्र तुला लिहितोय. सध्या बाजीराव-मस्तानी या हिंदी चित्रपटाची चर्चा
सुरू आहे. त्यातली गाणी वादात अडकलीयत. पेशव्यांचे आणि तुझेही वंशज त्या वादात हस्तक्षेप
करताहेत. त्यानिमित्ताने बाजीराव पेशवे, काशीबाई आणि तुझी चर्चा सुरू आहे.
मराठी कथा, कादंबऱ्या, इतिहासाची
पुस्तके, चित्रपट, मालिका, घरादारातल्या चर्चा यामध्ये तुझा विषय अधूनमधून असतो. तुझी
प्रतिमा, ओळख मराठी मुलखात बाजीरावाची रखेल अशी रंगवली गेली. नाची, कंचन अशी स्त्रीत्वाचा
अपमान करणारी दूषणे तुला जोडण्यात आली. तुझी अशी एक ओळख सांगण्यात येते की, तू पान
खायचीस, तेव्हा पानाची पिंक तुझ्या गळ्यातून खाली उतरताना दिसायची. तू पान खाऊन सज्जात
बसायची. आधीच पान खाणारी बाई म्हणजे वाईट चालीची असा समज. त्यात ती सुंदर आहे म्हटल्यावर
तर गुन्हाच. आणि परत सज्जात बसते म्हणजे जवळपास बदफैलीच!
इतिहासात, मराठी मुलखात,
तुझी ही अशी वाईट प्रतिमा रंगवणाऱ्यांनी तुझी बुद्धिमत्ता, तुझा प्रणामीपंथाचा वारसा,
तुझे शौर्य, तुझी मुत्सद्दी वृत्ती, बाणेदारपणा, उदारवृत्ती, प्रामाणिकपणा या गुणांना
झाकून ठेवले. प्रणामीपंथाचे थोर साधू मस्ताना यांचे स्मरण म्हणून तुझे वडील, छत्रसाल
यांनी तुझे नाव मस्तानी ठेवले. छत्रसाल बुंदेलखंडाचे राजे होते. त्यांनी हिंदू-मुस्लीम
ऐक्याची शिकवण देणारा प्रणामीपंथ स्वीकारला. वेद आणि कुराण यातला ईश्वर एक आहे असे
सांगत इबादत (भक्ती) आणि पूजा यांचा समन्वय या पंथाने आपल्या अनुयायांना शिकवला. हिंदू-मुस्लीम
भेद गाडून सर्व माणसे समान मानू, हे या पंथाचे वैशिष्ट्य आहे. समानता, धार्मिक सहिष्णूता
आणि निरामय प्रेम भावना या पंथाने शिकवली. भगवान श्रीकृष्ण आणि महंमद पैगंबर यांना
हा पंथ आदर्श मानतो. तो मूर्तीपूजा, कर्मकांड नाकारतो. देशभर प्रणामीपंथाचे अनेक थोर
साधू-संत-फकीर होऊन गेले. मराठी मुलखात संत तुकारामांचे समकालीन संत शेख महंमद महाराज
होऊन गेले. त्यांना शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांनी गुरूपद बहाले केले. ते प्रणामीपंथीय
होते. मालोजीराजे यांनी या गुरूला श्रीगोंदे (जि. अहमदनगर) येथे मठ बांधून दिला होता.
संत शेख महंमदांनी भागवत धर्म व प्रणामीपंथ यांच्या विचारांचा समन्वय घडवून भेदभाव
विरहित भक्तितत्त्वाचा विचार मांडला. भेदाभेद आणि दांभिकतेवर प्रहार करणाऱ्या या प्रणामी
पंथीय संताचा मराठी मुलखाला मोठा वारसा आहे. संत महमंदांचा एक अभंग आहे –
भुते मागती सांडणे
नर्क त्यांच्या हो भजणे
मागोन करविती हिंसा
भक्त उद्धरेल कैसा
पाणी पाषाण प्रतिमा
तेथे उन्मत्त होती जमा
वोळखीन ज्ञानदृष्टी
शेख महंमद निजभेटी
असा पाखंडी चालीरीतींवर
प्रहार करत सामाजिक एकता आणि विवेकवादी, ज्ञानदृष्टीची शिकवण देणाऱ्या प्रणामीपंथाचा
वारसा तू पुण्यात घेऊन आलीस. तुझ्याबरोबर वडिलांचा लोकोत्तर वारसाही होता. तुझे वडील
काही साधासुद्धा माणूस नव्हते. राजा छत्रसालाला लोक प्रतापी, सहिष्णू, आनंदधर्म उदगाते,
बुंदेलखंडाचे भाग्यविधाते म्हणत. आजही त्या भागात देवाआधी तुझ्या वडिलांची पूजा केली
जाते. छत्रसाल महाबली, कर दे भली, कर दे भली अशी प्रार्थना म्हणून आजही लोक छत्रसालाचे
आशीर्वाद घेतात. आलम दुनियेत असे प्रेम कुण्या राजाच्या वाट्याला आले नसेल. अशा वडिलांची
तू लाडकी कन्या होतीस.
पराक्रमी, लोकोत्तर वडिलांचे
तुझ्यावर संस्कार झाले. नृत्य, गायन, तलवारबाजी, तिरंदाजी या विद्येत तू लहानपणापासून
प्रवीण झालीस. संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास, तुलसीदास या संतांच्या अभंगरचना तुला
तोंडपाठ होत्या. कुराण, उर्दू साहित्याचा तुझा अभ्यास होता. जन्मानेच तुला वैभव लाभले.
गजान्त लक्ष्मीचा तुला अनुभव होता. असे म्हणत की, तुझ्या अंगरख्याला गुंडी म्हणून हिरे
झळकत असत. तुझा नवाबी थाट पोशाख आणि चालीरीतींत दिसे. तुझा बाजीराव पेशव्यांशी खांडा
पद्धतीने विवाह झाला. विवाहावेळी छत्रसालाने बाजीरावांना साडेतेहतीस लाखांचा प्रदेश
जहागीर म्हणून दिला. पन्ना इथल्या हिऱ्याच्या खाणीतला तिसरा हिस्साही भेट दिला. बुंदेलखंडावर
संकट आणणाऱ्या महमंद बंगशाला अडवले, पराभूत केले म्हणून ही भेट होती.
बाजीरावासोबत तू पुण्यात
आलीस. मराठे मुलुख आणि बुंदेलखंडाचे नाते यानिमित्ताने प्रस्थापित झाले. पेशव्यांनाही
बुंदेलखंडाशी नाते होणे गरजेचे होते. कारण दिल्ली ताब्यात ठेवण्याचा रस्ता बुंदेलखंडातून
जात असे. बुंदेलखंड कायम मोगलांचे शत्रू राज्य होते. हा श्रीमंत प्रदेश होता. तो आपल्या
सोबतीला राहावा अशी बाजीरावांची धोरणी दृष्टी होती. मराठी मुलुख आणि बुंदेलखंड मैत्रीचे
प्रतीक म्हणून बाजीराव आणि तुझ्या विवाह झाला असला तरी तुमचे नाते काही राजकीय व्यवहाराचा
भाग नव्हते. बाजीरावाचे तुझ्यावर खरे प्रेम होते. दोघांच्या एकमेकांवर पक्क्या निष्ठा
होत्या. तुझ्या प्रणामीपंथाचा विचार बाजीरावाने अंगीकारला होता. तुझी मराठी मुलखावरची
निष्ठा काळजातून आली होती. मराठी मुलुख तुला मनोमन आवडला होता.
बाजीरावाने तुला आणि तुझ्या
प्रणामीपंथाला पुण्यात, शनिवारवाड्यात नेले, पण पुण्याला ते आव्हान वाटले. सुरुवातीचे
तीन वर्षे तुझा संसार नीट चालला. तुला समशेर हा मुलगा झाला अन पेशवे कुटुंबात वादाची
वादळे उठू लागली. समशेर पेशव्यांचा वारस होऊ नये यासाठी व्यूहरचना करण्यात आल्या. त्यासाठी
तुझ्या बदनामीचा घाट घातला गेला. तुला रखेल ठरवण्यापर्यंत मजल गेली. तुला दारुडी ठरवले
गेले. तू निजामाच्या रक्षेची मुलगी, शहाजन खानाची कलावंतीण म्हणून बिगर खानदानी, कमी
प्रतीची, इतर स्त्रियांच्या बरोबरीची नाही असे ठरवले गेले. खरे म्हणजे तुला रखेल ठरवणारे
त्यांच्या स्त्रियांना तरी कुठे पुरुषांच्या बरोबरीचे मानत होते? स्त्री ही पायातली
वहाण, मुले पैदा करण्याचे मशीन अशीच भूमिका होती. त्यांनी तुला कमी मानले, हे त्यांच्या
मनोभूमिकेला धरूनच घडले. पण इतिहास असे सांगतो की, तुझ्या आणि बाजीरावाच्या विवाहाला
पिलाजी जाधव, राणोजी शिंदे, गोविंद पंत खेर, दावलजी सोमवंशी, नारोशंकर, तुकोजी पवार
असे मराठ्यांचे सारे मातब्बर सेनापती, कारभारी उपस्थित होते. त्यांची खुशी तुमच्या
दोघांसोबत होती. बाजीरावाची पहिली पत्नी काशीबाई हिच्यावरही अन्याय झाला नाही. बाजीरावाचे
तुझ्याएवढेच तिच्यावरही प्रेम होते. तू शनिवारवाड्यात आल्यानंतरही काशीबाईंना तीन अपत्ये
झाली. तुला पुण्याजवळ पाबळाला तीन गावे इनामे दिली. मोठी हवेली बांधून दिली बाजीरावाने.
समशेरच्या मुंजेचीही तयारी सुरू झाली होती. त्यानंतर वाद विकोपाला गेले. समशेरला पेशव्यांचा
वारस मानायला बाजीरावांच्या कुटुंबातली मंडळी तयार नव्हती. त्यात बाजीरावांचे अकस्मात
निधन झाले. त्या धक्क्याने तूही हे जग सोडून गेलीस. समशेरलाही पेशव्याच्या कुटुंबाने,
मराठी मुलखाने आपले मानले नाही.
खरे तर तू बाजीरावाची झालीस
आणि पेशवाई भरभराटीला आली. मराठी राज्याची घोडदौड प्रगतीकडे सुरू होती. या राज्यावर,
प्रजेवर तुझी बाजीरावाइतकीच निष्ठा होती. बुंदेलखंडाचे वैभव सोडून आई-बाप सोडून तू
हजारो किलोमीटर दूरवर आलीस. मराठी भाषा शिकलीस. तू मराठी संस्कृती अंगीकारली. पण मराठी
मुलखाने तुझ्याशी न्याय केला नाही. तुझा सन्मान करण्याऐवजी बदनामी, टिंगलटवाळी झाली.
गेल्या ३०० वर्षांत तुझ्या लढाऊपणाचा, बुद्धिमान, सहिष्णू परंपरेचा सन्मान म्हणून एकाही
मराठी माणसाने घरात एकाही नवजात बालिकेचे नाव मस्तानी ठेवले नाही. इतका या मुलखाने
तुझा दुस्वास कसा केला? या मुलखात तुला न्याय मिळाला नाही, तुझा सतत अपमान झाला. एक
मराठी माणूस म्हणून मस्तानी मी तुझी सपशेल माफी मागतो, बाई!
राजा कांदळकर
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी
मराठी live : १५/१२/२०१५