Sunday, December 30, 2012

डॉ. सुनिलम यांना जन्मठेप का झाली?


































अण्णांच्या आंदोलनात सक्रिय असलेले एक धडाडीचे कार्यकर्ते डॉ. सुनिलम यांना नुकतीच मध्यप्रदेशातील बैतूल न्यायालयाने आजीवन जन्मठेपेची शिक्षा दिली. आता ते तुरुंगवासात आहेत. दीड दशकापूर्वी १२ जानेवारी १९९८ रोजी मुलताई विभागातील शेतकऱ्यांची पीक नुकसान भरपाई मिळावी म्हणून डॉ. सुनिलम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं. या आंदोलनात शेतकऱ्यांनी उपस्थिती मोठी होती. या आंदोलनाला नंतर हिंसक रूप मिळाले. पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात बैतूल नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या वाहनांनी तोडफोड केली. या हिंसाचारात वाहन चालक धीरसिंह याचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या गोळीबारात २४ आंदोलक शेतकरी मारले गेले होते. जवळपास २५० लोक घायाळ झाले होते. आत्ता वाहन चालक धीरसिंह याची हत्त्या केली असा आरोप होता म्हणून डॉ. सुनिलम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आजीवन जन्मठेप आणि ५० हजाराचा दंड असं या शिक्षेचं स्वरूप आहे. सुनिलम  यांच्या समवेत प्रल्हाद अग्रवाल आणि शेषराव या दोघांनाही अशी शिक्षा झाली आहे.

सध्या तुरुंगात असलेल्या डॉ. सुनिलम यांनी तुरुंगातून चळवळीतल्या सहकाऱ्यांसाठी एक खुलं पत्र लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलंय की, माझ्यावर शेतकरी आंदोलनात काम करताना आठ वेळा जीवघेणे हल्ले झाले होते. सरकारच्या हस्तकांनी ते केले होते. त्यांनीच षड्यंत्र रचून मला शिक्षा व्हावी असा कट केला आहे. सत्य माझ्या बाजूने आहे. मुलताई आंदोलनात २४ शेतकऱ्यांचा जीव गोळ्या घालून घेणाऱ्या राज्यकर्ते, पोलिस आणि प्रशासन यांना कुणी काहीही करू शकत नाही. पण शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस घालून दीड शतक खोटे खटले चालवून आम्हाला तुरुंगात घातलंय. ही लढाई सामाजिक न्यायाची आहे.

आम्हाला शिक्षा देऊन हि व्यवस्था यापुढे न्यायासाठी आंदोलन करणाऱ्यांना इशारा देवू पाहतेय की, बघा यापुढे आंदोलनाच्या मार्गाने जाल तर तुमची अवस्था सुनिलम आणि त्यांच्या सहकाऱ्यासारखी करू. आमच्या आंदोलनात शेतकर्यांनी हिसांचार केला नाही. पोलिसांनी आणि प्रशासनाने हे सगळं घडवून आणलं. ठपका मात्र आमच्यावर ठेवला. आम्हाला बळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं सुनिलम यांचं  म्हणणं  आहे.

डॉ. सुनिलम कोण आहेत?
२७ जुलै १९६१ रोजी भोपाळ (मध्यप्रदेश) इथं जन्मलेल्या सुनिलम  यांचं मूळ नाव सुनिल मिश्रा. ग्वालेहरला केंद्रीय विद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. इथल्याच सरकारी सायन्स कॉलेजातून ते एम. एससी झाले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी बायोमेडिकल मेलबर्न इथल्या बर्नस इन्स्टीत्यूटमध्ये काही काळ त्यांनी काम केलं. तिथून परतल्यावर ते पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते बनले.

असा हा उच्चशिक्षण घेतलेला सधन कुटुंबातला कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या चळवळीत पडला. देशात-विदेशात सामाजिक प्रश्नांवर झालेल्या विविध चर्चासत्र, परिसंवादात त्यांनी जाऊन भाग घेतला. आपली मतं मांडली. मुलताईतले शेतकरी अडचणीत होतेतेव्हा ते तिथं धावून गेले. मुलताई किसान संघर्ष समितीची स्थापना केली. म. गांधीजींच्या मार्गाने शांततेने आंदोलन करण्याचा मार्ग निवडला. १२ जानेवारी १९९८ च्या घटनेनं  त्यांच्या जीवनाला कलाटणीच दिली. या घटनेनंतर त्यांच्यावर ६६ केसेस मध्यप्रदेश सरकारने दाखल केल्या. तेव्हा त्यांना तीन महिने तुरुंगात जावं लागलं होतं. या आंदोलनानंतर ते मुलताई विभागातून लोकांचे उमेदवार म्हणून मध्यप्रदेश विधानसभेसाठी उभे राहिले. आमदारही झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना काही प्रमाणात न्यायही मिळाला.

सुनिलाम देशभरात होणाऱ्या चळवळीत सक्रिय असायचे. नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांच्यासोबत पहिल्यापसून ते काम करायचे. अण्णांच्या आंदोलनात ते आघाडीवर होतेच. अशा लढाऊ कार्यकर्त्याला तुरुंगात जावं लागतंय याची खंत चळवळीतल्या सर्वांनाच आहे. सुनिलाम यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्रभर, देशभर विविध गट -संघटना प्रयत्न करत आहेत. अर्थात शांततेच्या मार्गाने हे प्रयत्न सुरु आहेत.

म्यानमार, भूतान या देशाच्या नागरिकांच्या स्वातंत्र्य लढ्यांना भारतातून मदत करणाऱ्या सुनिलम यांना स्वत:लाच तुरुंगात जावं लागतंय हा केवढा मोठा विरोधाभास!

त्यांच्या सुटकेसाठी वरच्या न्यालयात न्यालायाची लढाई सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या सुनिलम यांना न्याय मिळायला हवा.

- राजा कांदळकर (rajak2008@gmail.com)



Monday, October 29, 2012

पाकिस्तानला बदलवणारी मुलगी

















मलाला झियाउद्दीन युसूफझाई या १५ वर्षाच्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलीवर शाळेतून परताना पाकिस्तानातल्या स्वात खोऱ्यात तालिबान्यांनी गोळ्या झाडल्या. मळला डोक्यात गोळ्या लागल्याने बेशुद्ध झाली. अगोदर पाकिस्तानात आणि आत्ता इंग्लडमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत.

मृत्यूशी आजही झूंज देणारी मळला आहे तरी कोण? जगभरच्या लोकांचं कुतूहल जागृत झालं.

पाकिस्तानच्या स्वात खोर्यात मिंगोरा हे मलालाचं गाव. वयाच्या १२व्या वर्षापासून मलालाने स्वात खोर्यात कडव्या तालिबानींचा नंगानाच पहिला. साल होतं २००८-०९. तालिबान्यांनी स्वात खोऱ्यात मुलींच्या शिक्षणावर बंदीच फर्मान काढलं. मुलींनी टी.व्ही. बघायला नाही. पुस्तक वाचायची नाहीत. कॉम्पुटर, इंटरनेट वापरायचं नाही. मुली बिघडू नयेत म्हणून आम्ही हे फर्मान काढलं, असा तालिबान्यांचा दावा आहे.

या फर्माना विरोधात मलालाने आपल्या शाळा चालवणाऱ्या, कवी असलेल्या वडिलांना प्रश्न विचारून परेशान केलं. सुधारलेल्या विचाराच्या वडिलांनी मलाला हिला तालीबान्याविरोधात लढल्याच बळ दिलं. मुलींच्या स्वातंत्र्यावर, शिक्षणावर बंदी घातली गेली तरी कुणी बोलत नव्हतं. तेव्हा मलालाने प्रश्न विचारला शाळेत जाण्यात काय पाप आहे? स्वत:पुरता मलालाने फर्मानाचा विरोध कॉम्पुटर वापरायला सुरवात केली. ती इंटरनेट स्याव्ही बनली. तालिबान्यांच्या अत्याचारांच्या कथा, शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलींच्या कहाण्या तीन गुल मकाई या टोपणनावाने ब्लॉगवर लिहिल्या आणि थेट बीबीसीच्या ब्लॉगवर पाठवल्या. त्या झळकल्या आणि जगभर करोडो तरुणींनी, स्त्री-पुरुषांनी वाचल्या. तेव्हाच मलाला पाकिस्तानातल्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींची प्रतिनिधी बनली होती. मलालाच्या या कामामुळे २०११ साली आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासाठी तिला नामांकन मिळालं. पुरस्कार मिळू शकला नाही, पण पाकिस्तान सरकारने तिला खास शांतता पुरस्कार दिला आणि तिच्या कामाला सलाम केला.

मलाला म्हणत असे, मला राजकारणात जायचं आहे. समाज बदलायचा आहे. तिचे आदर्श होते, महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यासाठी लढलेले सरहद्द गांधी उर्फ खान अब्दुल गफार खान आणि बेनझीर बुत्तो. सरहद्द गांधी म्हणजे भारत पाकिस्तानच्या फाळणीला शेवटपर्यंत विरोध करणारा, फाळणीनंतर  २० वर्षे पाकिस्तानात राहून आपल्या पश्तून संस्कृतीसाठी शेवटपर्यंत लढणारा पठाणी सिंह. बेनझीर भुत्तो म्हणजे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पाकिस्तानाला आधुनिक बनवू पाहणारी आणि भारत द्वेषापासून दूर ठेवण्याचा विचार मांडणारी, शेवटच्या क्षणापर्यंत दहशतवादाविरुद्ध लढलेली सिंधी वाघीण. या दोघांचा वारसा उराशी बाळगणारी मलाला वेगळी ठरली यात नवल ते काय?

मृत्यूशी झुंज देणाऱ्या मलाला मागे साऱ्या पाकिस्तानातल्या मुली, तरुण उभे राहिले. जगाने तिची पाठराखण केली. आपल्या मुंबईच्या बगलेत असणाऱ्या मुब्र्यामध्ये सहाशे मुलींनी रस्त्यावर येऊन मलालाचा जीव वाचवा म्हणून प्रार्थना केली. मलालाच्या शूर कृतीमुळे ती केवळ पाकिस्तानातीलच नव्हे तर जगातली बहाद्दूर मुलगी ठरली आहे. तिच्या या लढाईने पाकिस्तानला बदलून टाकलं आहे.

- राजा कांदळकर (rajak2008@gmail.com)

सीमोल्लंघन आपलं आणि व्हेनेझुएलातलं!
















दसरा या सणाला आपल्या परंपरेत आगळंवेगळं महत्व आहे. चांगल्या विचारांचा विजय होतो. वाईटाचा नाश होतो. याची आठवण देणारा हा सण आहे. नुस्ती आठवणच नाही तर या दिवशी नव्या गोष्टी साकार करण्यासाठी उभं राहण्याचा निर्धार करायची. पुढे जायचं. नव्याचा ध्यास घ्यायचा. विजयी होण्याकडे घोडदौड करायची असा याचा अर्थ.

हा दसरा आज आपल्या देशाच्या जीवनातही महत्वाचा ठरणार आहे. अण्णांनी जनलोकपालबरोबर निवडणूक सुधारणांचं आंदोलन उभं करण्याची हाक दिली आहे. त्यासाठी जमवाजमव सुरु केली आहे. नवे साथीदार जोडले आहेत. या दसऱ्याला भ्रष्ट शक्तीचं दहन करायचं आणि नव्या जोमानं अण्णांना साथ द्यायचा निर्धार करायचा आहे. हे एक नवं सीमोल्लंघन या वर्षीच्या दसऱ्याच्या निमित्ताने ठरेल. देशभर गावागावात, शहाराशहरात ते व्हावं. लोक अशा सीमोल्लंघनाला तयार आहेत.

आणखी एक सीमोल्लंघन होत आहे. व्हेनेझूएला या लॅटिन अमेरिकेतील देशात ते होतंय. तिथं नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यात समाजवादी नेते हुगो चावेझ हे पुन्हा निवडून आले. आपल्या विरोधकांच्या सुमारे दहा टक्के मतांनी त्यांनी पराभव केला. चावेझ याच्याबद्दल थोडंस. तरुणपणी लष्करात जवान असलेले चावेझ आत्ता ५४ वर्षाचे आहेत. गेली १४ वर्षे ते व्हेनेझूएला या देशाच्या जडणघडणीत महत्वाचा रोल बजावत आहेत. १५ वर्षापूर्वी लष्करातून बाहेर पडून त्यांनी राजकारणात भाग घेतला. समाजवादी विचारांनी देशात चळवळ केली. हा समाजवादी विचार जुनाट नव्हे. तो आहे एकविसाव्या शतकाचा. त्यामुळे तो तरुणांना आवडला. तरुणांनी व्हेनेझूएलात चावेझच्या नेतृत्वाखाली गरिबांची क्रांती केली. सत्ता गरिबांसाठी राबवली. देशाची सत्ता मिळाल्यावर चावेझ यांनी काही धडक निर्णय घेतले. व्हेनेझूएला हा तेल उत्पादक देश. पण एकेकाळी तेलातील निर्माण होणारी संपत्ती धनदांडग्यांच्या खिशात जाई. काही अमेरिकेच्या कपाटात जाई. चावेझने तेलाचा पैसा गरिबांच्या योजनेकडे वळवला. त्यामुळे दारिद्र्यात लक्षणीय घट झाली. चावेझने आरोग्य आणि शिक्षण मोफत केलं. पालकांनी मुलगा फक्त शाळा, कॉलेजात नेऊन घालायचा. त्याला हवं ते शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची. खाजगी शाळा नाहीत की भरमसाठ फी उकळणाऱ्या शिक्षणसंस्था या देशात नाहीत. आजारी पडलेल्या माणसाने दवाखान्यात जायचे, त्यावर योग्य ते उपचार करण्याची जबाबदारी सरकारची. असं सामान्य माणसाला दिलासा देणारं वातावरण या देशात आहे. चावेझ यांनी अनेक उद्योगांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यामुळे गरिबांच्या घरात आनंद भरला. धनिकांचा मात्र जळफळाट झाला.

धनिक भांडवलदार चावेझला का विरोध करतात?

चावेझ येण्याअगोदर व्हेनेझूएला हा देश अमेरिकेच्या पंजाखाली दबून काम करी. अमेरिका सांगेल ती पूर्वदिशा. अमेरिकेची दादागिरी जगभर जशी चालते तशी लॅटिन अमेरिकेतही चाले. अमेरिकेच्या या दादागिरीविरोधात चावेझने तांबूस लाट निर्माण केली. २१ व्या शतकातल्या समाजवादाचा नारा दिला. चावेझची तांबूस क्रांती यशस्वी झाली.

आत्ताच्या निवडणुकीत चावेझला लोळवण्याचा अमेरिकेने आणि त्यांच्या व्हेनेझुएलातल्या देशी भांडवलदार बगलबच्चानी अतोनात प्रयत्न केला. सर्व श्रीमंत वर्ग चावेझच्या विरोधात गेला. व्हेनेझुएलातली वर्तमानपत्रं आणि न्यूज channels  त्याच्या विरोधात होते. पण गरिबांनी, तरुणांनी, महिलांनी त्याची साथ सोडली नाही. तो विजयी झाला. 

व्हेनेझूएलात चावेझच्या विजयाने नवं सीमोल्लंघन झालं.

व्हेनेझूएलात आपल्या देशासारखेच भाववाढ, भ्रष्टाचार, गुन्हेगारी असे प्रश्न आहेत. अध्यक्ष चावेझसमोर ही आव्हानं आहेत. त्याचे विरोधक पूर्वीपेक्षा जास्त संघटीत झालेत. त्यात चावेझला कॅन्सर झालाय. चौदा वर्षे तो आव्हानांचा मुकाबला करतोय. विविध प्रश्न सोडवतोय.

जगभर गरिबांची बाजू लंगडी पडत चालली आहे. धनदांडगे, शिरजोर आहेत. अशा काळात गरीबांचा झेंडा खांद्यावर घेऊन लढणारा एक नेता म्हणून चावेझ खंबीरपणे उभा आहे.

या दसऱ्याच्या निमित्ताने चावेझकडे, त्याच्यामागे उभे राहणाऱ्या तरुणांकडे अपेक्षेने पाहणं गैर ठरणार आहे.

- राजा कांदळकर  (rajak2008@gmail.com)

Thursday, October 11, 2012

स्वप्न पाहिलेला माणूस!



दूध न आवडणाऱ्या इंजिनिअर माणसानं दूध क्रांती करावी. केरळातल्या मल्याळी भाषा बोलणाऱ्या ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या मुलानं म. गांधींच्या गुजराथी समाजात 'अमूल डेअरी' काढावी. आपल्या देशाला जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवण्याचं स्वप्न बघावं. त्या स्वप्नासाठी वयाची ९० वर्षे रात्रंदिन खपावं. हे सारंच अदभूत आणि अलौकिक असं आहे.

असं स्वप्नवत जीवन जगणारा डॉ. व्हर्गीस कुरीयन हा माणूस होताच तसा अदभूत. त्यांचा जन्म केरळातील कोझीकोड येथे २६ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला . चेन्नईतील लोयोला कॉलेजातून ते पदवीधर झाले. नंतर इथल्याच गिंडी कॉलेज ऑफ इन्जिनीअरिन्ग  मधून पदवी घेतली. जमशेदपूर येथे टिस्कोमध्ये काम केले. त्यावेळी त्यांना दूग्ध अभियान्त्रीकेच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळाली. बंगळूर च्या अनिमल हजबंडरी या संस्थेत प्रशिक्षण घेऊन ते अमेरिकेला गेले. तिथं त्यांनी मिशिगन विद्यापीठातून मकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये मास्टर्स पदवी घेतली. त्यात त्यांचा दुग्ध अभियांत्रिकी हा विषय होता.

एवढं शिक्षण घेऊनही त्यांना अमेरिकेची स्वप्नाळू दुनिया आकर्षून घेऊ शकली नाही. ते अमेरिकेत स्थायिक होऊ शकले असते. पण त्यांना स्वदेश खुणावत होता. ते तिथलं ऐशोरामी जीवन लाथाडून स्वदेशात परतले. थेट गुजरातमधल्या आनंद इथं गेले. कायरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघटनेत सहभागी झाले. सरदार वल्लभभाई पटेल आणि त्रिभुवनदास पटेल या मोठ्या माणसांनी दूध क्रांतीचं स्वप्न पाहिलं. डेअरी स्थापन करून सामान्य माणसांना रोजगार देण्याचं, सहकारी चळवळ उभारण्याचं स्वप्न रंगवलं होतं. त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी कुरियन यांनी स्वतःला झुकून दिलं.

डेअरी संस्करण प्रकल्प सुरु झाला. त्यातून अमूलची निर्मिती झाली. अमुलचा प्रयोग यशस्वी झाला नंतर साऱ्या गुजरात राज्यात त्यांची पुनरावृत्ती झाली. सर्व दूध उत्पादक संघटना गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या नेतृत्वाखाली एकत्र केल्या. शेतकरी, शेतमजुरांच्या घरात पैसा यावा म्हणून सहकारी दूध व्यवसायाचा अभिनव प्रयोग साकारला गेला.

कुरियन यांनी या महासंघात आणि रुरल management  या संस्थेत १९७३ ते २००६ पर्यंत काम केलं. कुरियन यांच्या काळात देशाच्या दुग्धव्यवसायात क्रांतीच झाली. जगात फक्त गाईच्या दुधाची पावडर बनत असे. पण भारतात म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करण्याचा पहिला प्रयोग केला. तो यशस्वी झाला. अमूलचं यश बघून जय जवान, जय किसान ही घोषणा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांनी अमूलच्या धर्तीवर national डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था स्थापन केली . या संस्थेमार्फत ऑपरेशन फ्लड ही  योजना १९७० च्या सुमारास सुरु झाली त्यामुळे भारत जगातील मोठ्या दुध उत्पादक देशांपैकी एक बनला. ३३ वर्षे कुरियन national dairy बोर्डाचे अध्यक्ष होते. भारताची दूध खरेदी १९६०च्या दशकात २ कोटी मेट्रिक तन होती. ती २०११ मध्ये १२.२० कोटी मेट्रिक तन इतकी झाली. हा स्वप्नवत कायापालट झाला तो केवळ कुरियन यांच्यामुळेच. विशेष म्हणजे विकासाची साधनं सामान्य माणसाच्या हातात दिली तरच खरा विकास होतो हे या योजनेत स्पष्ट झालं. देशभर आणि जगभर कुरियन यांच्या कामाची वाहवा झाली.

भारताची मान जगात उंचावणाऱ्या कुरियन यांच्यावर सन्मानाचा अक्षरशः वर्षाव झाला. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा नागरी सन्मान देऊन गौरवलं. जागतिक अन्न पुरस्कार, Raman Magsese पुरस्कार, कार्नेगी- वॉटलेत जागतिक शांतता पुरस्कार, अमेरिकेचा International  Person of the year असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. मी भारतातल्या शेतकरयांचा कर्मचारी आहे अशी कुरियन बांधिलकी मानत म्हणूनच त्यांनी दूधाच्या महापुराचं स्वप्न पाहिलं. त्याचं महत्त्व भारताला, जगाला पटवून दिलं.

हे स्वप्नवत काम काही सहजासहजी झालं नाही. हा देश सर्व क्षेत्रात बलशाली व्हावा हे स्वप्न पं. नेहरू आणि त्यांच्या सहकारयांनी पाहिलं होतं. देशातल्या सामान्य दीन दुबळ्या माणसाचं ते स्वप्न होतं. या दुबळ्या मानसाच स्वप्न साकार करण्याच काम कुरियन यांनी केलं. आज खाजगीकरणाचा मोठा बोलबाला आहे. खाजगीकरणामुळे मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहतात. सरकारी प्रकल्प, सहकारी संस्थांचे उद्योग मोडून पडतात. त्याचं काही खरं नाही असा खाजगी उद्योगपतींच्या चेल्यांचा गाजावाजा असतो. सगळ्या समाजाला खाजगी करणातून सारं काही भव्य दिव्य, विकास-फिकास होतो हे सांगणारयाच्या तोंडात कुरियन यांचं काम थप्पड मारणारं आहे.

इंडिया विरुद्ध भारत हा संघर्ष आपल्या देशात जुना आहे. इंडियावाले खाजगीकरण,  जागतिकीकरण, मॉल, multinational , कंपन्यांचा झोक, बडेजाव यांनी भूललेत. भारतातले लोक आजही इंडियावाल्यांच्या कुकर्मांचे बळी म्हणून चिरडले जात आहेत. बळी म्हणून चिरडले जायचं नाही तर हातात हात घेऊन पुढं जायचं, आपलं नशीब आजमायचं हा मंत्र कुरियन यांनी गरिबांना दिला. गरिबांच्या घरात विकासाचा उजेड यावा हेच कुरियन यांचं खरं स्वप्न होतं. ते साकार करण्याचा प्रयत्न त्यांनी अमूल डेअरीच्या माध्यमातून केला.

म्हणून हा माणूस मोठा. ९ सप्टेंबरला आपल्यातून गेला. त्याचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आता आपली. कुरियन यांना भारतरत्न हा किताब जिवंतपणी मिळाला नाही हेही आपलं दुर्दैव. भारतरत्न मिलो न मिळो कुरियन भारताच्या लोकांचे रत्न होतेच.
त्यांना सलाम !


- राजा कांदळकर



















Friday, August 31, 2012

स्वतः विषयी सांगताहेत तुकारामांचे वंशज डॉ. सदानंद मोरे .

 डॉ. सदानंद श्रीधर मोरे, देहूकर (जन्म -25 जून 1952) हे संत तुकारामांचे दहावे वंशज. पुणे विद्यापीठात तत्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक. संत्विचारांचे भाष्यकार, लोक व्यवहाराचे अभ्यासक, चिंतक आहेत. आजच्या काळाचे अव्वल संशोधक म्हणून महाराष्ट्र त्यांना जाणतो. 'तुकाराम दर्शन', 'लोकमान्य ते महात्मा' हि त्यांची पुस्तक गाजली. 'उजळत्या दिशा' हे नाटक लक्षवेधी ठरले. असा चतुरस्र  लेखक, विचारवंत आणि क्रियाशील पंडित त्यांच्या वयाची साठी यावर्षी पूर्ण करतोय. त्यानिमित्ताने त्यांची राजा कांदळकर यांनी घेतलेली ही  मुलाखत. - 

प्रश्न : सर, तुम्ही संत साहित्याचा अभ्यास आणि मांडणी करताना परंपरा आणि आधुनिकता यांचा मेल घातलेला दिसतो. याविषयी काय सांगाल ?

डॉ.  मोरे : मला तुकारामांचा वारसा मिळाला . घरातच अध्यात्म, कीर्तन, प्रवचनाची  परंपरा मिळाली. आमच्या घराण्याला मानणारा मोठा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर आहे. माझे आजोबा कीर्तनकार होते. वडील श्रीधरबुवा मोरे देहूकर हे अभ्यासक आणि सामाजिक अग्रणी होते. 1942 च्या लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. तेव्हा त्यांचे शिक्षणही अर्धवट राहिले . असं असलं तरी वडिलांना विविध विषयांचा व्यासंग होता . संतांनी वारकऱ्यांना फक्त अध्यात्म शिकवलं नाही तर अध्यात्म्साधानेशिवाय इतरवेळी व्य्यव्हारात माणूस म्हणून चांगलं कसं वागावं, याविषयी अभंगातून मार्गदर्शन केलं आहे. वारकरी काही 24 तास अध्यात्मात दंग असत नाही . भक्ती करण्याची वेळ सोडली तर इतरवेळी अध्यात्म नसतं. त्यावेळी सामान्य माणसासारखंच त्याचं जगणं असतं. समाजातले सगळे लोक पूर्ण वेळ परमार्थ करू शकत नाहीत. काही मोजके लोक  सर्व वेळ परमार्थ जरूर करू शकतात . काही धर्मात अशी तरतूद आहे की काही लोकांनी सर्ववेळ अध्यात्म साधना करायची. अशा लोकांना यती म्हणतात . संन्याशीही म्हणतात. या संन्याशांची व्यवस्था समाजातल्या इतरांना करायची . वारकरी संप्रदायात मात्र अशी व्यवस्था नाही . वारकरी प्रापंचिक असतात. हे कीर्तन, प्रवचन, उपदेश करतात . संसार करून परमार्थ करणं हे वारकरी संप्रदायात महत्त्वाचं मानलं जातं. स्वतः तुकोबा असे वारकरी होते . त्यांनी त्यादृष्टीने जीवनवादी उपदेश केला .

ब्रिटीश काळात आपल्या सामाजिक जीवनाचं संस्थीकरण झालं. समाजात काम करायचं तर संस्था काढून त्याद्वारे काम करण्याची परंपरा सुरु झाली. अनेकांनी शिक्षण संस्था काढल्या. समाजोपयोगी विविध संस्था समाज जीवनात अस्तित्वात आल्या. वारकऱ्यांनी  स्वतःच्या संस्था काढल्या नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं संस्थीकरण केलं गेलं नाहीत. त्यातून वारकऱ्यांचा ऐहिक जीवनाशी काहीच संबंध राहिला नाही. त्यामुळे लोक म्हणू लागले, संत साहित्य, त्याचा अभ्यास हे देवधर्माशी सबंधित गोष्ट आहे. जगण्याशी त्याचा फारसा संबंध नाही. हे खरं नव्हतं. मी मात्र आपलं जगणं, संत साहित्याचा अभ्यास आणि आपला समाज यांच नातं एकच आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला.

माझा आजचा पिंड घडला माझ्या वडिलांमुळे ते आमच्या घराण्याला देहूकर म्हणून ओळखतात. आमच्या घराण्यात कीर्तनाची परंपरा होतीच. वारकर्यांमध्ये विविध फड आहेत . वेगवेगळी घराणी आहेत . हे फड, घराणे स्वतःच्या प्रथा, परंपरा, शिकवण यानुसार वर्तन करतात . एका फडकऱ्याने  दुसऱ्या फडकऱ्याचे ऐकायचं  नाही स्वतःच्या फडाची शुद्धता जपायची असा आटोकाट प्रयत्न प्रत्येक जन करीत. माझ्या वडीलांनी मात्र सर्वांचं ऐकायचं. चांगलं ते घ्यायचं वांगलं ते टाकून द्यायचं असं ठरवलं. त्यांनी मामा दांडेकर, जोग महाराज, आजरेकर महाराज, केशवराव देशमुख, दादा महाराज सातारकर अशा मोठमोठ्या वारकरी कीर्तनकार, नेत्यांबरोबर सलोखा जोपासला. वडील पायी पंढरीला जात. वेगवेगळ्या फडांचा अभ्यास करत . माहिती घेत. वेगवेगळ्या संप्रदायाचा अभ्यास करत. वारकरी संप्रदायाच्या बाहेरच्या अध्यात्मिक तत्वावेत्त्यांचा त्यांनी अभ्यास केला. स्वामी विवेकानंद, कृष्णमूर्ती यांचं तत्वज्ञान अभ्यासलं. त्याविषयीची पुस्तकं जमा केली. आचार्य रजनीश, रमणमहर्षी यांचे विचार समजून घेतले. कृष्णमूर्तीना तर ते भेटलेही होते. वडिलांनी अशा वेगवेगळ्या संप्रदायाचा अभ्यास करून त्यातून चांगले ते घेतलं. त्यामुळे त्यांची दृष्टी, विचार करण्याची पद्धत व्यापक झाली . हा अभ्यास केल्यानंतर वडिलांना जाणवलं की, वारकरी संप्रदाय हा स्वतंत्र धर्म आहे. वेगळं दर्शन आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी पहिल्यांदा हे स्पष्ट केलं. जसं महानुभाव हा पंथ स्वतंत्र दर्शन आहे. त्याच्या अनुयायांना त्याची सुरुवातीपासूनच कल्पना होती . वारकरी संप्रदायात मात्र तशी जाणीव नव्हती. स्वतंत्र दर्शनासंबंधीची मांडणी वारकरी संप्रदायात कुणी केली ही नाही.

माझ्या वडिलांविषयी सांगत होतो . त्यांनी ख्रिश्चन  अभ्यास केला . आधुनिक तत्वज्ञानाच्या विविध ज्ञानशाखा, साहित्यशास्त्र, समाजशास्त्र याविषयीची पुस्तकं आमच्या घरात भरलेली होती. नवभारत, मराठी साहित्य पत्रिका, अमृत, सोनोपंत दांडेकरांचं  प्रसाद, आचार्य अत्रेंचा मराठा हे अंक घरी येत. वडील पुण्याला वारंवार जात. आमच्या जमिनीचे खटले चालत. त्यासाठी जावं लागे. पुण्यातून येताना वडील विविध विषयांवरची पुस्तकं घेऊन येत. आईनस्टाइन, मार्क्स, लेनिन यासह वेगवेगळ्या व्यक्ती आणि विषयांवरची पुस्तकं आमच्या घरात येत. मला ती वाचता येत असत.

प्रश्न - वडिलांमुळे तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या बाहेरचं वाचन लहानपणीच करायला मिळालं. त्यातून तुमच्या विविधांगी अभ्यासाला विचार करण्याला चालना मिळाली. तुमची अगदी लहानपणीही जडणघडण  होत होती....

डॉ.  मोरे : अगदी शाळेत होतो तेव्हा पासूनच घरात मला विविध पुस्तकं वाचायला मिळाली. माझी आई शिक्षिका. तिनंच मला संस्कृत शिकवलं. माझ्या वडिलांइतका विविधांगी दृष्टीचा माणूस देहून दुसरा नव्हता. मोठमोठे लोक घरी येत. त्यामुळे वि. का. राजवाडे यांनी वारकरी संप्रदायाला  challenge करणारी मांडणी केली होती. त्या मांडणीला भा. पं. बहिरट यांनी सडेतोड उत्तर दिलं होते. बहिरट मोठे विद्वान होते. ते वडिलांचे मित्र. आमच्या घरी येत, त्यांच्या चर्चा मी ऐकत असे. दादा महाराज घरी येत. आमच्या बंगल्यात मुक्काम करत. माझे चुलते नव्हते. फडकरी असणं हे खूप कष्टाचं. ते वर्षभराचं काम. पंढरीत त्यांना वारंवार जावं लागतं. थांबावं लागतं. हे माझे चुलते म्हणजे एक अवलिया माणूस. खूप उपक्रमशील, प्रतिभावंत होते. त्यांची स्मरणशक्ती कमालीची, कथा, आख्यायिका, किस्से, उदाहरण त्यांच्या तोंडपाठ असत. एम.ए. पर्यंत मला लोक त्यांचा शिष्य म्हणून ओळखत. मी त्यांच्या जवळपास वावरलो. खूप उचापती केल्या. माझ्यातला कार्यकर्ता त्यांच्या अवतीभवती घडला. या चुलत्यांनी स्वतःचं लग्न सत्यशोधक पद्धतीने केलं होतं. वारकरी असून एवढे क्रांतिकारक होते ते.

प्रश्न - त्यावेळी वारकरी संप्रदायात साखरे महाराज, जोग महाराज, दांडेकर महाराज हे ब्राह्मणी मांडणी करत होते. ही  मांडणी तेव्हा तुमच्या लक्षात येत होती ?

 डॉ.  मोरे : होय त्यांची मांडणी ब्राह्मणी वळणाची होती. खरे तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी वारकर्यांना अर्धेब्राह्मण म्हटलं होतं. म. फुलेंचाही वर्कायांवर आरोप होता. हे धड इकडचे नाहीत आणि तिकडचेही. मध्येच लोंबकळत असणारे आहेत, असं समाज सुधारक म्हणत. वारकऱ्यांचं ब्राह्मणीकरण झालंय असं निदान करत म. फुल्यांनीही त्यांना ब्राह्मणी परंपरेकडं ढकलून दिलं पण वास्तव हे होतं की सत्यशोधक समाज तुकोबांनाच नायक मनात होता. फुलेंना सत्यशोधक समाजासाठी पाठींबा मिळाला तो वारकरी संप्रदायाचा प्रभाव असणाऱ्या जुन्नर, आंबेगाव, चाकण या पुणे जिल्ह्यातल्या परिसरातूनच हा परिसर देहू-आळंदीच्या पुढे येतो.

संत गाडगे महाराज देहूत येत असत. ते खरे वारकरी. त्यांना वारकर्यातलं क्रांतीकारकत्व पहिल्यांदा कळलं. बाबांना तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, शामराव देसाई हे मोठे शिष्य लाभले. गाडगे बाबांनी वारकरी संप्रदायात मोठी घुसळण घडवून आणली हिंदू धर्माचा सामाजिक वारसा सांगण्याचं, त्यातलं क्रांतीकारत्व उजळून दाखवण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. तसंच काम गाडगे महाराजांनी वारकरी संप्रदायांच्या बाबतीत केलं.

मी कॉलेजात असतानाच वडील मला पुण्यातल्या जेधे मँशनमध्ये घेऊन गेले. तेव्हा केशवराव जेधे मोठे नेते. काँग्रेसची सूत्रं तिथून हलत. महाराष्ट्रातील निवडणुकीचं तिकीट वाटप तिथून होई. यशवंतराव चव्हाण तेव्हा नवीनच होते. ते इथल्या बैठकीत कोपऱ्यात बसत. त्यांना अजून एवढं महत्व आलेलं नव्हतं लहान असतानाच मी असा  वडीलांबरोबर वावरल्याने मला वेगवेगळे समाजातले प्रवाह कळत गेले. राजकारण, समाजकारण समजून घ्यायला सोपं गेलं. शाळेतही मी हुशार होतो. matrick ला असताना मला पदवी पर्यंतचं  ज्ञान होतं. एवढा मी mature होत गेलो.

वडिलांबरोबर मी बरोबरीच्या नात्याने विविध विषयावर चर्चा करायचो. आमच्या दोघांतलं वयातलं अंतर गळून पडलं. घरी मोठी माणसं येतं. त्यांच्याशी मी त्यांच्या पातळीवर जाऊन चर्चा करायचो. त्यांच्याशी माझं ज्ञानसाधना करणार्यांचं नातं तयार झालं. अशी माझी जडण घडण होत होती. देहून कीर्तन ऐकणं पुण्यात कॉम्रेड डांग्यांचं भाषण ऐकूण हे मला काही वेगवेगळं आहे, असं वाटत नसे. त्यात समान धागा शोधात असे. तशी विचाराची सवय लागली.

प्रश्न - तुम्ही विद्यार्थीदशेत देहूत आचार्य अत्रेंच्या प्रचाराची सभा घेतली होती.

डॉ. मोरे - तेव्हा मी ७ वी इयत्तेत होतो. अत्रेंचा मराठा मी वाचत असे. त्यात विविध वाद काळात. साहित्य राजकारणावरची मत मतांतर वाचायला मिळत. भाऊ पाध्ये यांच्या 'राडा' या कादंबरीवरून झालेला वाद मराठात मी वाचला. दि . पु. चित्रे मराठातच भेटले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ कळली. अत्रे आणि 'प्रभात्कार' वा. रा . कोठारी यांचा वाद समजला. १९६२ सालची निवडणूक होती. अत्रे संयुक्त महाराष्ट्र समितीमार्फत रिपब्लिकन        पक्षाचे उमेदवार म्हणून आमच्या मतदार संघात निवडणूक लढवत होतो. हि जागा रिपब्लिकन पक्ल्शाला सोडली होती. त्यांना उमेदवार नव्हता , त्यांनी अत्रेंना उमेदवारी दिली. माझ्यावर मराठमुळे अत्रेंचा प्रभाव. मला आनंद झाला. आता आपल्याला अत्रेंचा प्रचार करायला मिळणार होता. मी वडिलांना म्हणालो आपल्या गावात अत्रेंची सभा अजून कशी झाली नाही. इतर उमेदवारांच्या सभा होऊन गेल्या. वडील म्हणाले, अत्रेंना उमेदवारी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते दलित वस्तीत आहेत. गावात कोण सभा घेणार. मग मी दलित वस्तीत गेलो. माझे तरुण मित्र जमा केले. पोस्टर, खळ, शिडी घेतली. गावभर अत्र्यांचे पोस्टर डकवले. त्यानंतर अत्र्यांची सभा घेतली. पण ती गावात नाही दलित वस्तीतच  घेतली तिथल्या कार्यकर्त्यांनी माझी ओळख आपल्या पक्षाचा कार्यकर्ता अशी करून दिली.

या सभेच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष, त्यातली गटबाजी, समाजातला जातीवाद, त्यावेळच्या संयुक्त महाराष्ट्र  समितीचं राजकारण कळलं. पुढे मी उजळल्या दिशा हे आंबेडकरी चळवळीवरचं नाटक लिहिलं. त्यात मी दलितांचा प्रश्न मांडलाच. राजकारण, समाजकारण, संस्कृती हे एकमेकांशी एका धाग्यांनी गुंफलेल्या एकजिनसी असतात हे मला कळत गेलं.

मी अकरावीत होतो. तुकाराम बीजेला मी समाज सुधारक हा लेख लिहिला. 'मराठा'त अत्रेंनी तो छापला. हा माझा छापून आलेला पहिला लेख. त्या दिवशी अत्रे देहूला आले. गावकर्यांना म्हणाले, तुकारामांवर लेख लिहिलेला तो लेख कुठाय ? लोक म्हणाले, कुठला लेखक ? तो पोरगा आहे. मग अत्रेंची भेट झाली. त्यांनी मला मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं. नंतर कीर्तन करायला लागलो. लोक ऐकायचे. आदर करायचे. लिहायलाही लागलो.

पुढे अहमदनगरला कॉलेजात नोकरी लागली. तिथं लाल निशाण पक्षाचे दत्ता देशमुख, भापकर, भास्कर जाधव याच्या विचारांना समजावून घेता आलं. त्यात श्रमिक विचार हे लाल निशान पक्षाचे मुखपत्र त्यात लिहिलं अगदी सिनेमा, नाटक, चळवळी अशा सर्व विषयावर लिहायचो. मार्क्सवादाचा अभ्यास केला. अशा पाश्च्यात्य विचारवंत वाचले. त्यातून व्यापक जग समजून घेता आलं.

प्रश्न - तुकाराम दर्शन लिहिताना तुम्ही सर्व जनवादाची मांडणी केली, तुम्ही ' सर्वजनवाद' हा शब्द प्रथम वापरला. तो उच्चारला

डॉ. मोरे - वारकरी संप्रदाय 'सर्वजनवादी' आहे, हे राजाराम शास्त्री भागवत यांच्या पहिल्यांदा लक्षात आलं. मी तुकाराम दर्शन मध्ये त्याची मांडणी केली. वारकरी संत सर्व जातीतून आले. ज्ञानबा-तुकाराम हे चोखाबापर्यंत आपल्याला ते दिसतं. हा सर्वजनवाद बहुजन वादापेक्षा वेगळा आहे. 'बहुजन' हा शब्द प्रथम टिळकांनी वापरला. टिळकांनी, गोखले, रानडे या उच्चशिक्षित, अर्जविनंत्याचं राजकारण करणाऱ्या पुढार्यांना अभिजन म्हटलं. त्यांच्या बरोबर जे नाहीत, त्यांना बहुजन संबोधलं. म्हणजे मवाळा विरुद्धचे सर्व बहुजन असं टिळकांना म्हणायचं होतं. मवाळांनी  टिळकांना तेल्या तांबोळयांचे पुढारी म्हटलं. म्हणजे टिळक बहुजन झाले नंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन पक्ष काढला.बहुजन शब्दांची मांडणी त्यांनी आर्थिक पायावर केली. बहुजन म्हणजे ब्राह्मणेतर नाही तर जो जो गरीब तो तो म्हणजे गरीब, किराणा दुकान चालवणारा ब्राह्मणही बहुजन होय अशी शिंदेंची मांडणी होती.

शिंदे म्हणत कि राखीव जागा द्या. पण त्या फक्त अस्पृश्यांना द्या. अन्यथा भांडणं लागतील. पुढे तेच दिसतं. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद उफाळला. काँग्रेसनं ब्रिटीशांकडे शक्य तेवढं  लवकर आमचं राज्य आम्हाला करू द्या, अशी मागणी केली होती. जिना, टिळक, हे नेतेअसाग्रह्धर्न्यत एक होऊन आघाडीवर होते. ब्राह्मणेतर चळवळीचं मात्र असं मत होतं की, स्वराज्य नकोच. कारण ते मिळालं तरी ब्राह्मणांच्या हातात जाणार. मग उपयोग काय ? शिंदे यांनी यावेळी म्हटलं की, अरे आपण राज्यकर्ते होतो. ब्रिटीश सरकार स्वातंत्र्य देणारच आहे. तर घ्यायला काय हरकत आहे. यावरून खल झाला. जातिवाद फोफावला. त्याला ब्रिटीशांनी खतपाणी घातलं. इथला जातीवाद ब्रिटीशांनी वाढवला हे खरं नाही. तो पूर्वी होताच. ब्रिटीशांनी त्यावर त्यांची पोळी भाजली. त्याला पोसला. ब्रिटीशांनी राखीव जागांच्या प्रश्नावर सगळ्यांना झुलवलं. ब्राह्मणेतर चळवळ फुटली. मुस्लीम, मराठा यांना राखीव जागा नको, ते राज्यकर्ते होते, अशी शिंदे यांची मांडणी होती. शाहू महाराज राखीव जागांचे पुरस्कर्ते होते.

राखीव जागांचा खेळ पुढे धोकादायक बनला. शिंदे यांनी या धोक्याचा पहिल्यांदा इशारा दिला होता. त्यात एक जात विरुद्ध इतर जाती असं म्हणता येईल. ब्राह्मण विरुद्ध इतर, मराठा विरुद्ध इतर असे वाद आज आपण पहिले. मंडळ आयोगानंतर या वादांची तीव्रता जास्त वाढली. पूर्वी ब्राह्मण, दलित, मराठा व ओबीसी यांच्यात वाद खेळले जातात. या वादात एक जात विरुद्ध इतर सर्व जाती असा आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळला जातो. वि. रा. शिंदे यांनी त्याबद्दल वारंवार सजग केलं होतं. यावर उपाय सर्वजनवादाचा आहे. एक समाज म्हणून आपण प्रश्नांकडे पाहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असं मला वाटतं.


प्रश्न - वारकरी संप्रदायात वेगवेगळे प्रवाह आज घुसलेले दिसतात. त्याविषयी.

डॉ. मोरे - लोकहितवादींनी वारकऱ्यांना अर्धे ब्राह्मण म्हटलंच होतं. आजही वारकऱ्यांना चांगलं नेतृत्त्व मिळालेलं नाही. त्यामुळे ते अर्धे इकडे अर्धे तिकडे असे लोंबकळत आहेत. आमच्यकडे पैठण विरुद्ध पंढरपूर हा झगडा जुना आहे. पैठण हे हिंदू धर्मशास्त्राचं असलेलं गाव. पंढरपूरच्या वाळवंटात समतेचं केंद्र आहे. वारकरी संप्रदायाची धार मराठ्यांना सत्ता मिळाली अन बोथट झाली. समृद्धी आली की प्रत्येकाला पोटापुरतं मिळतं. समाज संतुष्ट बनतो. अठराव्या शतकात मराठे भारतभर पसरले. महाराष्ट्रात मराठ्यांना ब्राह्मणांसह इतर जातींनाही सैन्यात कामं मिळाली. सैन्य लुट करून आणी. लुटीचा हिस्सा थोडा घरातही येत असे. समृद्धीचं वाटप होत होतं. अजिबात नाही असं कमी झालं. काही मिळवायचं हा सामाजिक संघर्ष कमी झाला. समाज गाफील राहिला. वारकरीही बेसावध राहिले. नंतर ब्रिटीश आले. त्यांनी उत्तर भारतातल्या ब्राह्मणांसह शिखजणांना सैन्यात घेतलं पण मराठ्यांना घेतलं नाही. मराठे हि लढाऊ जमत आहे ते दगाफटका करतील याची ब्रिटीशांना भिती होती.

अशा वातावरणात मराठी समाजाची पिछेहाट होत गेली. वारकरी संप्रदाय या काळाची पावलं ओळखू शकला नाही. ब्रिटीशांनी नवी विद्या आणली. नवा विचार आणला. वारकरी जास्त शिकले नाहीत. त्यांच्यातलं कुणी इंग्रजी विद्या जनात न्हवतं. त्यावेळी वारकऱ्यांच ब्राह्मणीकरण होत गेलं. १८व्या शतकाच्या शेवटी बाबा पाध्ये यांनी हिंदू धर्मशास्त्रावरचा शेवटचा ग्रंथ लिहिला. तो पैठणमध्ये नव्हे तर पंढरपुरात लिहिला. धाकटे बाजीराव पेशवे लवाजम्यासह पंढरपूरला वारीला जाऊ लागले. वारकऱ्यांत भांडणं होऊ लागली.

हिंदू धर्माची चौकट जातव्यवस्थेसह या काळात वारकरी संप्रदायात घट झाली. पूर्वी वारकरयांत जात होती पण ती एकमेकांना टोचत नव्हती. पुढे टोचणं चालू झालं. संतांचा क्रांतिकारी उपदेश वारकर्यांना पुढे नेता आला नाही. ब्रिटिश राजवटीचे फायदे घेता आले नाहीत. वारकरी संप्रदायाने पाश्चात्य शिक्षण घेण्यात कसर ठेवली.

गाफील वारकरी समूहात मग ब्राह्मणी विचार बळकट झाला. पुढे हिंदुत्त्ववादी घुसले. विश्व हिंदू परिषदेनं पंढरपुरात संतपूजा केली. हा घुसखोरीचा एक प्रकार होता. याउलट पुरोगामी, डावे, अभ्यासक यांनी वारकऱ्यांची टिंगलटवाळी  करणं चालू ठेवलं. हे वर्णजात मानणारे, दैववादी अशी दूषणं दिली. त्यांच्यात जाऊन काही सुधारणा करण्याचं टाळलं. संतांच्या क्रांतिकारी उपदेशाला दूर लोटलं. याचा बरोबर फायदा हिंदुत्त्ववाद्यांना झाला. वारकरी संप्रदायातल्या पोकळीत हिंदुत्त्ववादी उभे राहिले.

पुण्यात पालख्या आल्या की, ज्ञानप्रबोधिनी हि संस्था वारकऱ्यांना औषधपाणी पुरवते. त्याला काय लागतं ? दोन-तीन डॉक्टर आणि सर्दी खोकला-तापाची औषधं - गोळ्या. पण बोर्ड लावतात. आरोग्य सेवा देतात. याउलट बघा. हडपसरमधून पालखी दरवर्षी जाते. तिथं समाजवाद्यांनी सुरु केलेला मोठा साने गुरुजी दवाखाना आहे. या दवाखान्याचे लोक, संस्थाचालक, डॉक्टर कधीही वारकऱ्यांना ज्ञानप्रबोधिनीसारखी आरोग्य सेवा देत नाहीत. याला काय म्हणायचं ?


जिथं आपली सत्ता आहे तिथं ती वापरली पाहिजे. ते ना कम्युनिस्टांनी केलं, ना समाजवाद्यांनी, मग वारकरी तुमच्याकडे कसे यातील ? त्यांना तुम्ही जवळचे कसे वाटाल ?


संत नामदेवांनी त्यांची सत्ता पंढरपुरात वापरली. संत चोखोबांच्या देहाचे अवशेष गोळा केले. विठ्ठलाच्या मंदिराच्या दारात समाधी बांधली. एका अस्पृश्याची समाधी विठोबाच्या दारात. हिंदुस्थानात असं दुसरं उदाहरण नसेल. नामदेवांना हे करताना विरोध झालाच नसेल असं मला वाटत नाही.

ज्यांना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं त्यांना चोखोबाचं दर्शन घ्यावंच लागेल हे ठणकावून सांगण्यासाठी नामदेवांनी हे  केलं . नामदेव एकदा ओंढ्याला गेले होते, देवळापुढे कीर्तन करायला त्यांना मना केलं गेलं. त्यांनी देवळाच्या मागे जाऊन कीर्तन केले. देऊळ फिरवले ही कथा त्यातून आली. कीर्तन महत्त्वाचं देऊळ नव्हे हा त्यातला संदेश. नामदेव हा पहिला मराठी संत. देशभर गेलेला. राष्ट्रीय झालेला. त्यांनी दिंड्यांचं संघटन केलं. फड जागविला. वारकऱ्यांचं नेट्वर्किंग केलं.

हे क्रांतीकारत्त्व नंतरच्या वारकरी नेत्यांना पुढे नेता आले नाही.


प्रश्न - वारकरी संप्रदायाचं नेतृत्त्व संतांचा शहाणा विचार पुढे न्यायला कमी पडलं, असं तुम्ही मांडत आलात. तुम्हाला तुकोबांचा वारसा आहे. तुमचा व्यासंग मोठा आहे. तुम्ही चळवळीत कार्यकर्ते म्हणून काम केलंय. वारकरी संप्रदायाचं नेतृत्त्व तुमच्यासारख्या क्रियावान पंडित का करत नाही !

डॉ. मोरे - माझ्यात एवढी मोठी क्षमता नाहीए. मी चाळीस वर्षं काम करतोय. मांडणी करतोय. हळूहळू बदल होतोय. काहि महिन्यांपूर्वी आम्ही वारकरी साहित्य परिषद स्थापली. फडकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, त्या व्यासपीठावर एकत्र आलेत. प्रबोधनाची भूमिका पुढे जात आहे. संतांचे विचार बालवयात समजले पाहिजेत. शालेय अभ्यासक्रमात या संत साहित्याचा समावेश व्हायला हवा. संत साहित्य-विचार याविषयी संशोधन, अभ्यासाला गती मिळाली पाहिजे. अभ्यास केंद्र, ग्रंथालय स्थापन झाली पाहीजेत. प्रवचन-कीर्तनकारांचा शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या वारकरी शाळा निघाल्या पाहिजेत. आजच्या गोंधळमय आणि भरकटलेल्या जीवनाला दिशा देण्याची ताकद संतांमध्ये आहे. त्या विचारांचं सतत जागरण झालं पाहिजे असं मला वाटतं. इ त्या चळवळीतला एक पाईक म्हणून काम करतोय.


पूर्व प्रसिद्धी
रिंगण 







Friday, August 17, 2012

म्हणे, सौम्य भ्रष्ट्राचार विकासाला हितकर!














चीन हा आपला शेजारी देश. तिथं कम्युनिस्ट राजवट आहे. या देशात आपल्यापेक्षा जास्त प्रगती आहे. जगात हा देश आता एक महासत्ता म्हणून उदयाला आला आहे. जगातल्या सत्तेचा तोल सध्या आशियाकडे सरकतोय. हे चीनमुळे घडतंय. चीनने अमेरिका, इंग्लंड या देशांची पैशाच्या शेत्रातील सर्व मक्तेदारी मोडून काढली. इतकेच नव्हे तर खेळापासून तर अंतराळापर्यंत सर्व क्षेत्रात चीनने पाश्यात्यांच्या मक्तेदारीला सुरुंग लावले.

चीन या देशाने श्रीमंत व्हायचे वेड जोपासले. या वेडाच्या बळावर हा देश पुढे गेला. आपल्या देशासारखीच तिथली परिस्थिती आहे. आपल्यासारखीच शेती, आपल्यासारखाच समाज, भौगोलिक वातावरण तिथं आहे. एकेकाळी गरीबीही आपल्यासारखीच होती. माओच्या नेतृत्वाखाली तिथं कम्युनिस्टांची लाल क्रांती झाली. त्यानंतर हा देश पुढे झेपावला. त्यानंतर त्याने मागे फिरून पहिले वर्षात या देशात साठ कोटी लोक गरिबीतून उच्च मध्यमवर्गात गेले.

चीनची ही प्रगती म्हणजे मानवी इतिहासाला एक मोठा विक्रम आहे. मानवजातीने कोणत्याच देशात असा पराक्रम आजपर्यंत केलेला नाही. म्हणून चीनचं कौतूक सगळ्या जगाला आहे. असं असलं तरी या देशात आता  विकासाच्या भरारी आड भ्रष्टाचाराची समस्या भेडसावू लागली आहे. चीनमध्ये नवे नेते सत्तेवर आहे आहेत. ते सत्तांतर घडत असताना जुन्या नेत्यांच्या भ्रष्टाराच्या विचित्र कहाण्या वर्तमानपत्रं, प्रसिद्धी माध्यमात वाचायला, ऐकायला मिळत आहे. भारतात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने जगभर विविध देशात जागृती झाली. चीन हा देशही त्याला अपवाद कसा ठरेल?

अण्णांच्या आंदोलनाचे पडसाद चीनमध्येही उमटले. तिथले लोकही भ्रष्टाचारावर बोलू लागले. त्यामुळे सत्ताधारी कम्युनिस्ट नेते अस्वस्थ झाले. चीनच्या प्रगतीचं श्रेय तिथल्या सत्ताधारी कम्युनिस्ट नेत्यांना दिलं जातं. चीनी नेते व्यवहारवादी, अभ्यासू, नव्या जगाची पावलं ओळखणारे आहेत असं म्हणून त्यांचं कौतुक केलं गेलं. उलट भारतातल्या नेत्यांकडे हे गुण नाहीत ते घराणेशाही आणि स्वार्थाने लडबडलेले आहेत म्हणून भारत मागे पडतोय अशा चर्चा झाल्या. चीनचे नेते भारतातल्या नेत्यांपेक्षा उजवे आहेत हे खरंच पण चीनी नेतेही भ्रष्टाचारात अडकलेले आहेत हे आत्ता पुढे आल्याने त्यांचेही पाय मातीचेच आहेत हे उघड झालं.

आता आपल्या भ्रष्टाचाचाराच्या कहाण्या जगाला कळल्यानंतर चीनी नेत्यांनी एक हुशारी केली. त्यांनी भ्रष्टाचाराचं छुप समर्थन करायला सुरुवात केली. सौम्य भ्रष्टाचार विकासाला हितकर असतो, एवढेच नव्हे तर गरजेचा असतो असं या नेत्यांनी म्हणायला सुरुवात केली. चीनमध्ये 'ग्लोबल टाईम्स' हे सरकारची तळी उचलणारं एक वर्तमानपत्र आहे. त्याच्या अग्रलेखात चीनी राज्यकर्त्याचं धोरण स्पष्ट झालंय. ते म्हणतात, 'भ्रष्टाचार पूर्णपणे हटवायचा मार्ग कोणत्याच देशात सापडलेला नाही. तेव्हा भ्रष्टाचार लोकांना सहन होईल इतपत ठेवणे महत्वाचे आहे. चीनमध्ये तसे न करणे कमालीचे क्लेषदायक ठरेल. भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला तर देशात गोंधळ माजेल. हे चीनी जनतेने समजून घ्यावे. भ्रष्टाचार समूळ उपटणे हे कमालीचे अवघड आहे. त्यातील यश अन्य शेत्रावरील यशावर अवलंबून आहे. पुढारी स्वछ आहेत पण देश काही शेत्रात मागासलेला आहे. अशा परिस्थितीत सापडलेल्या चीनी देशाची कल्पनाही करवत नाही. असे जरी शक्य असले तरी परवडणारे नाही.'

या अग्रलेखावर चीनमध्ये प्रचंड टीका झाली. तरी थोडा भ्रष्ट्राचार गरजेचा असतो हे समजून घ्या असा चीन सरकार, पदाधिकाऱ्यांचा लोकांना आग्रह आहे. हे नेते म्हणतात, 'आम्ही बिलियन डॉलरवर डल्ला मारला आहे तरी देशाची अर्थव्यवस्था सात ट्रिलियन डॉलरवर नेऊन ठेवलीय बघा. त्याबद्दल आमचं कौतुक करणार कि नाही?'

भ्रष्टाचाराचं हे समर्थन पटणारं नाही. तळ राखणार्यानं म्हणावं, मी तळ्यातलं पाणी किती चोरलं हे महत्वाचं नाही. तळ तर राखलं ना. ते कुणालाही चोरू दिलं नाही ना? असा लंगडा युक्तीवाद करण्यासारखं हे आहे.

अर्थात चीनची जनता या लंगड्या युक्तीवादाला फसणार नाही. पण चीनमध्ये भ्रष्टाचाराचं जे समर्थन सुरु आहे, ते भारतीय जनतेनं समजावून घेणं गरजेचं आहे. कारण नेते किती हुशारी करू शकतात हे चीनच्या नेत्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसतंय. भारत तर चीनचा शेजारीच. आपल्या देशात अजून उघडपणे कुणी भ्रष्टाचाराचं असं समर्थन केललं नाही. पण शेजारच्या घरातला हा वास आपल्याकडेही येणार नाही असं नाही. सावध तर राहिलंच पाहिजे.


- राजा कांदळकर (rajak2008@gmail.com)   
     

Wednesday, August 15, 2012

छोट्या माणसांच्या मोठ्या गोष्टी!

मॅगसेसे  पुरस्कार (2012) विजेत्या
तैवानच्या भाजीविक्रेत्या - चेन शु चु 

मॅगसेसे  पुरस्कार (2012) विजेते 
तामिळनाडू राज्यातील - कुलंदेई फ्रान्सिस 

यंदाचे  रेमन  मॅगसेसे  पुरस्कार नुकतेच जाहीर झाले . त्यातला एक  मॅगसेसे पुरस्कार तैवानच्या एका भाजी विक्रेतीला मिळाला. दुसरा पुरस्कार तामिळनाडू  मधल्या  एका ग्रामीण भागात गरिबांची कर्जमुक्ती करणाऱ्या माजी फादरला मिळाला. ही दोन्ही सामान्य माणसं. मग त्यांना एवढा मानाचा पुरस्कार मिळण्याचं कारण काय? तर या दोघांनीही श्रीमंतांना लाजवील असं काम केलं म्हणून त्यांचा गौरव झाला.

त्यातल्या भाजीविक्रेत्या महिलेचं नाव - चेन शु चु. वय 61 वर्षे. शिक्षण सहावी. त्यांचा तैवानच्या तैतुंग मार्केटात भाजीविक्रीचा एक छोटेखानी stall आहे. गरजवंताला मदत केल्यानेच पैशाचा खरा उपयोग होतो. लोकांना साहाय्य करण्यात मला समाधान मिळतं, आनंद मिळतो हे या बाईचं तत्वज्ञान. सामाजिक कामाचा कोणताही बडेजाव या बाईनी मिरवला नाही. मात्र या महिलेने आत्तापर्यंत 70 लाख तैवानी डॉलर्स म्हणजे 1 कोटी 29 लाख रुपयांची मदत मुलांसाठी काम करणाऱ्या  संस्थांना  दिली. त्या शाकाहारी आहार घेतात. दिवसातून दोनदा जेवतात. माणसाला काम करण्याची उर्जा मिळण्यासाठी यापेक्षा जास्त जेवणाची अपेक्षा नाही असं या महिलेच मत आहे.

हि महिला जमिनीवर साधं अंथरूण टाकून झोपते. शिक्षणाने जीवनाचा कायापालट होतो. अशी तिची श्रद्धा आहे. पोटासाठी त्यांनी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरु केला. गरीबांमुळे कोणाचा शिक्षणाचा हक्क ओरबाडला  जाऊ नये त्यासाठी त्या त्यांच्या कमाईतून बचत करू लागल्या. तो निधी संस्थांना देऊ लागल्या.

त्यांच्या मदतीने अनेकांना शाळा शिकता आली बाईंच्या पैशातून मुलांसाठी ग्रंथालय सुरु झाले. अनाथ, नडलेले, पीडलेले, दलित यांना शिक्षण, आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. त्यांना घरं मिळवीत यासाठी त्यांची धडपड सुरु आहे.

आशिया खंड हा गरीबांचा भूभाग आहे. इथं माणसांचे प्रश्न कमी नाहीत. जागतिकीकरणामुळे हे प्रश्न अधिक बिकट झालेत, ते सोडवायचे तर सरकारला विविध योजना राबवाव्या लागतील. नव्या योजनांची आवश्यकता जास्त आहे. पण समाज बदलासाठी सरकार काय करते हे न बघता स्वतः जबाबदारी स्विकारून या बाई स्वतः               छोटे मानवी बेट झाल्या. म्हणून रेमन मॅगसेसे फाउंडेशनने त्यांचा गौरव केला. रेड क्रॉसने नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी आपत्कालीन निधी स्थापन केला आहे. त्यासाठीही चेनबाई मदत करतात. एक भाजीविक्रेती समाज बदलासाठी स्वतः त्याग करून खारीचा वाट उचलू शकते हे या उदाहरणावरून दिसतं.

आपल्या आसपास पैसेवाले अनेक आहेत. पण त्यांना पैशाची लवकर चढते. ते गरीबांपासून दूर पळणं पसंत करतात. श्रीमंतीचं ओंगळवाणं  प्रदर्शन लग्न, वाढदिवस, सणसमारंभ, उत्सवात करतात. अशा लोकांसाठी या गरीब बाईची श्रीमंती डोळ्यात अंजन घालणारी ठरावी.

दुसरे मॅगसेसे पुरस्कार विजेते कुलंदेई फ्रान्सिस हे मजुराच्या घरात जन्मलेले. ते लहान असताना त्यांचा वडिलांनी सावकाराकडून पाचशे रुपयांचे कर्ज घेतले. ते फुगले. पुढे 50 हजार झाले. त्यामुळे या साऱ्या भावंडांना शिक्षण सोडावं लागलं. मोलमजुरी करावी लागली. ते भोग भोगलेले फ्रान्सिस कॅथलिक धर्मगुरु झाले. पण त्यांच्या मनात सावकारी पाशाविषयीची गाठ सुटली नव्हती. सात-आठ वर्षात त्यांनी चर्चला सोडचिट्टी दिली आणि पूर्ण वेळ कर्जमुक्ती चळवळीला वाहून घेतलं. या कर्जमुक्ती चळवळीत महिलांचे गट स्थापन केले जातात. हा गट मोठ्या बँकांकडून एकत्रित कर्ज घेतो. हे सहकाराचे मॉडेल फ्रान्सिस तीन दशकं चालवत आहेत. हे काम करताना त्यांना एकही कर्जबुडवणारी महिला भेटली नाही. आता या बचत गटातील महिलांनी 250 कोटी रुपयांची गंगाजळी तयार केली आहे. अशा सातशेहून अधिक स्वयंसहायता गटांची उलाढाल अडीच हजार कोटी रुपयांच्या पुढे गेलीय. हे काम तामिळनाडूतल्या तील जिल्यात चाललेलं आहे. या इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्रामचा विस्तार शाळांतून जालासंधारणापर्यंत आणि गरिबांसाठीच्या दवाखान्यांपर्यंत झालाय.

महिलांच्या सहकारातून कर्जे देणे - फेडण्याबरोबर नवी विकासाची कामं उभी राहत आहेत हे या प्रकल्पाचं वेगळेपण. बांग्लादेशाच्या महंमद युनुस यांच्यापेक्षा हे काम वेगळा आहे. म्हणूनच त्यांना हा पुरस्कार मिळाला. हे काम फ्रान्सिस आता तामिळनाडू राज्यभर पसरवणार आहेत. अशी हि दोन छोटी माणसं. त्यांची गोष्ट मात्र मोठी आहे. आपलं जग बदलवणारी आहे.

- राजा कांदळकर (rajak2008@gmail.com)         

Monday, July 30, 2012

जगण्याबद्दलचे आम्हाला वाटले तसे...


आपल्या अवती भवती दररोज असंख्य घडामोडी घडत असतात. काही आपलं लक्ष वेधतात. काही घटना आपले डोके भंजाळून सोडतात. खर तर  सर्वच घटनांना वेगवेगळे angle असतात. आम्ही या ब्लोग मार्फत आपल्याशी संवाद साधू महत्वाच्या घटनांच्या चौथ्या view विषयी. अर्थात तुमच्याही या विषयावरच्या मतांचे आम्हाला अगत्य आहे.