Thursday, October 22, 2015

दोन शक्तिप्रदर्शने - शिवाजी पार्क आणि रेशीमबाग













दरवर्षी दसऱ्याला महाराष्ट्रात दोन मेळावे होतात. खरे तर ती शक्तिप्रदर्शनेच असतात. परवाच्या दसऱ्याला शिवसेना मुंबईत आणि रा.स्व.संघ नागपुरात काय करतो हा कळीचा मुद्दा असेल. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. ज्या दिवशी सेनेने हिंदुत्वाचे राजकारण करणारी भूमिका घेतली, तेव्हाच हे स्पष्ट झाले की राज्यात हिंदुत्ववादी भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या दोन पक्षांपैकी एकच वरचढ ठरेल, दुसरा हळूहळू दुबळा होईल. भाजप वरचढ ठरत असून, शिवसेनेची वाटचाल घसरणीच्या दिशेने निदान सध्यातरी होताना दिसते आहे.

या दसऱ्याला राज्यात दोन मोठी शक्तिप्रदर्शने होणार आहेत. पहिले-मुंबईत शिवाजी पार्कवर शिवसेनेचे. दुसरे-नागपुरात रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली. त्याला आता ५० वर्षे होत आहेत. ३० ऑक्टोबर १९६६ ला दसऱ्याला शिवाजी पार्कवर पहिली मोठी सभा झाली. त्यालाही ५० वर्षे होत आहेत. २२ ऑक्टोबर २०१५ला दसऱ्याला सेना आपली पन्नाशी साजरी करत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ९१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. संघाची स्थापना १९२५ साली झाली. २०१५ हे साल संघाच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण आहे. या वर्षात ९१वी साजरी करताना संघाच्या विचाराचाच पक्ष देशात सत्तेवर आहे. संघाचे स्वयंसेवक पंतप्रधान आहे. केंद्राच्या मंत्रिमंडळातले बहुतांशी मंत्री संघाच्या शाखेवर किंवा आसपास घडलेले आहेत. महाराष्ट्रातही संघाचे स्वयंसेवक मुख्यमंत्री आहेत. संघाच्या विचाराचा पक्ष सत्तेत आहे. एकूण संघात, स्वयंसेवकांत आनंदाचे वातावरण असताना संघाचा दसरा मेळावा, शक्तिप्रदर्शन नागपुरात होईल.

हे दोन शक्तिप्रदर्शनाचे कार्यक्रम पार पडत असताना देशातली आणि राज्यातली राजकीय परिस्थिती दोन्ही संघटनांसाठी तणातणीची आहे. सेनेला सतत असे वाटतेय की, केंद्राच्या, राज्याच्या राजकारणात आपला आब राखला जात नाही, महत्त्व दिले जात नाही. मंत्रिमंडळ आणि सत्तेतला योग्य वाटाही दिला जात नाही. शिवाय सेनेशी विधानसभा निवडणुकीत युती तोडून भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवल्या. सेनेपेक्षा जास्त जागा जिंकून तो राज्यातला एक नंबरचा पक्ष बनला. सेना दोनवर फेकली गेली. जोपर्यंत बाळासाहेब होते, तोपर्यंत सेना एक नंबरवर होती. भाजपाला कब्जात ठेवायची बाळासाहेबांची रणनीती नेहमी यशस्वी ठरायची. बाळासाहेब संघाला कधी जुमानत नसत. भाजपने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर कमळाबाई म्हणून हिणवत. सेनेला तुमची गरज नाही. तुमची (भाजपाची) गरज म्हणून सेनेशी तुमची युती आहे हे बाळासाहेब बोलून दाखवायचे. पण ते गेल्यानंतर भाजपने सेनेवर मात केली. भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सेनेला सत्तेचा तोकडा वाटा पदरात पाडून घ्यावा लागला. दररोज मानहानी स्वीकारत सेना सत्तेत सहभागी आहे. सेनेने स्वाभिमान सोडलाय, सेना गुळाला मुंगळे चिकटावे तशी सत्तेला चिकटलीय असले अगदी जिव्हारी घाव पडावेत असे आरोप सहन करत सेनेची वाटचाल सुरू आहे. सेना नेत्यांना हे सगळे राजकारण असह्य होत असेल. सामान्य शिवसैनिकाला तर भयंकर चीड येत असेल.

सेनेची ही अशी दयनीय स्थिती होणे ही एक स्वाभाविक राजकीय घटना मानावी लागेल. ज्यांना संघ आणि भाजप यांची विस्तारवादी आणि वर्चस्ववादी रणनीती माहीत आहे, त्यांना हे समजून घ्यायला अजिबात अवघड जाणार नाही. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. ज्या दिवशी सेनेने हिंदुत्वाचे राजकारण करणारी भूमिका घेतली, तेव्हाच हे स्पष्ट झाले की राज्यात हिंदुत्ववादी भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या दोन पक्षांपैकी एकच वरचढ ठरेल, दुसरा हळूहळू दुबळा होईल.

महाराष्ट्रात यापूर्वी हे दिसले आहे. संघ परिवाराच्या राजकारणापुढे प्रखर हिंदुत्वाची भूमिका असलेला हिंदू महासभा हा पक्ष टिकू शकला नाही. हिंदू महासभेला स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा स्वत:ची प्रतिमा असलेला नेता लाभला होता. सावरकरांना स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी होती. त्यांचे स्वत:चे एक राजकीय वलय होते. ते फर्डे वक्ते होते. लेखक, कवी होते. तरीही त्यांच्या नेतृत्वाखालच्या हिंदू महासभेला घरघर लागली. नंतर तो पक्ष संपला. संघ परिवार मात्र गेली नव्वद वर्षे घोडदौड करतो आहे. ती इतकी की नव्वदी साजरी करताना या परिवाराने देशाची सत्ता ताब्यात घेतली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, हरयाणा, जम्मू-काश्मीर या महत्त्वाच्या राज्यात संघ परिवाराची सत्ता आहे. लोकसभेत प्रचंड बहुमत आहे.

संघ परिवाराची राजकारण करण्याची एक स्वत:ची पद्धत आहे. हिटलरच्या नाझीवादातून ती विकसित झाली आहे. या परिवारात व्यक्तिवाद, घराणेशाही, कुटुंबशाही या गोष्टींना थारा नाही. संघ परिवाराची ताकद म्हणजे संघटनेची हुकूमशाही असे समीकरण आहे. संघ एकछत्री म्हणून काम करतो. त्याखाली शेकडो संघटना एकेक मुद्दा घेऊन कार्यरत आहेत. नव्वद वर्षांत या संघटनेत मतभेदातून फूट पडलेली नाही. लाखो स्वयंसेवक एका ध्येयाने पछाडून काम करतात. थोर मराठी लेखक पु.ल. देशपांडे यांनी संघाच्या संघटन शिस्तीला मुंग्यांची रांग असे संबोधले होते. मुंग्या ज्या शिस्तीने रांगेत चालतात, त्या शिस्तीने स्वयंसेवक काम करतात. हा म्हटला तर टीकेचा, म्हटला तर कौतुकाचाही विषय आहे. एवढ्या महासमन्वयाने काम करणारी आज देशात दुसरी संघटना दिसत नाही. संघाचे टीकाकारही हे मान्य करतात.

संघ परिवाराची राजकारणाची व्याख्या सर्व समाजाला कब्जात घेणारी आहे. निवडणुकांचे राजकारण एका बाजूला करताना संघ परिवाराने बँका, आरोग्य, शिक्षण, स्वयंसेवा, साहित्यव्यवहार, धर्म, विविध जाती-जमाती, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, ग्राहक चळवळ अशा नाना क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्था उभ्या केल्या. त्या माध्यमातून समाज जीवनावर कब्जा करायचा, देशाचे संघीकरण करायचा त्यांचा प्रयत्न आहे. असे संस्थात्मक काम सेनेत मात्र होताना दिसत नाही. सेनेने सुरुवातीला मराठी माणसांच्या हक्कांची आरोळी दिली. दाक्षिणात्य यंडूगुंडूंचे मराठी माणसावरचे आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेने शिवसैनिकांची नोंदणी केली. पुढे अल्पावधित सेना म्हणजे मराठी माणूस असे समीकरण झाले. सेनेची आंदोलने नेहमी राडेबाजीची राहिली, तरी सामान्य मराठी माणसांना सेनेविषयी विश्वास वाटला. त्यामागे बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा करिष्मा हा एक मोठा घटक होता. सनदशीर आंदोलने, निषेध मोर्चे, अर्ज, विनंत्या करण्यापेक्षा कानाखाली आवाज काढणे, तोंडाला काळे फासणे, धांगडधिंगा, धूडगूस, राडेबाजी, हुल्लडबाजी या मार्गाने सेनेने समाजात, सरकार दरबारी स्वत:चा दबदबा वाढवला. काँग्रेस सत्ताधाऱ्यांच्या उग्र चेहऱ्यामुळे सेनेची ही हिंसक आंदोलने लोकांनी स्वीकारली. त्यातून बाळासाहेब सरसेनापती झाले. पण जेव्हा बाळासाहेब हिंदूहृदयसम्राट झाले, तेव्हा संघ परिवार आणि सेनेत टकराव झाला. तो अनेकदा दिसला.

हा टकराव हिंदुत्वाचा मुद्दा कोण जास्त पुढे नेतो यामधून झाला. दोघांनाही हिंदुत्वाचा अजेंडा पुढे न्यायचाय. त्यासाठी सत्ता मिळवायचीय. या स्पर्धेत सध्या सेना मागे पडताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे मागे पडणे सतावत आहे. या अगतिकतेतूनच गुलाम अलींना विरोध, सुधींद्र कुलकर्णींना काळे फासणे, सनातनचा उघड कैवार, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला विरोध या भूमिका सेनेकडून घेतल्या जात आहेत. तर ते निष्प्रभ करण्यासाठी भाजप सत्तेचा वापर करत आहे. सुधींद्र कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला भक्कम पोलीस संरक्षण पुरवून, तो कार्यक्रम यशस्वी करवून भाजपने सेनेवर मात केली. तिला दाबण्याचा प्रयत्न केला.

ही दाबादाबी यापुढेही चालू राहणार. कारण एका म्यानात कुणी राहायचे हा खरा प्रश्न आहे. आता म्यानात आम्हीच राहणार हे भाजप-संघ परिवाराने दाखवून दिले आहे. संघ परिवाराच्या या आक्रमणापुढे सेना टिकणार की, घसरत जाणार हा प्रश्न यापुढे महत्त्वाचा राहणार आहे. सेनेला स्वत:ची आणखी घसरण नको असेल तर तिने संघ परिवाराशी उघड टक्कर घेतली पाहिजे. पण कधी माघार, कधी समन्वय, कधी अपमान या खेळात सेना घोटाळत राहिली, तर लवकरच सेनेची हिंदू महासभा झाल्याशिवाय राहणार नाही. सेनेने संघ परिवाराशी लढण्याची रणनीती ठरवत स्वत:ची विचारधारा निश्चित करावी. खरे तर प्रबोधनकार ठाकरेंचा मोठा वारसा सेनेने सतत नाकारून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. तो वारसा पुन्हा उजळवला तर सेना संघावर मात करू शकेल. या दसऱ्याला उद्धवजींची डरकाळी जरूर फुटेल, पण ती नागपूरच्या रेशीम बागेत संघापर्यंत पोचेल काय? सेना नेतृत्वाने आता संघाचे काय करायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे.

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २०/१०/२०१५

Thursday, October 15, 2015

मोदींच्या तोंडावर बंड घडले, तुम्ही पाहिले?

 

परवा उरणमध्ये जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे भूमिपूजन करायला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या भागातील प्रकल्पग्रस्तांनी काळे झेंडे दाखवून स्वागत केले. आम्हाला कुणाचे भय नाही. शेंडी तुटो वा पारंबी तुटो. आम्ही आमचा हक्क पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही, हा या प्रकल्पग्रस्तांचा बाणा आहे. काय आहेत त्यांच्या समस्या?

देशाचा पंतप्रधान खोटा वागतो, आगरी समाजाची फसवणूक करतो!

नरेंद्र मोदी यांचा निषेध असो!

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे!

साडेबारा टक्के भूखंड मिळालाच पाहिजे!

प्रकल्पग्रस्तांना न्याय नाकारणाऱ्या भाजप नेत्यांचा निषेध असो!

आगरी समाजात फूट पाडणाऱ्या भाजप नेत्यांचा निषेध असो!

या केवळ घोषणा नाहीत. उरण (जि. रायगड) तालुक्यातल्या आगरी, कोळी समाजातल्या हजारो शेतकरी-कष्टकऱ्यांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या ठिणग्या आहेत. मुंबईत ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) चौथ्या बंदराचे भूमिपूजन केले. त्यावेळी मोदींच्या तोंडावर उरण परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी या घोषणा दिल्या. विरोध नोंदवला. काळे झेंडे फडकवले. हा विरोध का झाला?

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नरेंद्र मोदींनी जेएनपीटीजवळ अंबानी-अदानी यांच्या कंपन्यांच्या सेझच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी पाच प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हस्ते भूखंड दिल्याचे इरादापत्र देण्यात आले होते. त्या पाच शेतकऱ्यांनी ती इरादापत्रे अलिबागला कलेक्टर कचेरीत नेऊन दाखवली तर ती खोटी आहेत, असे सिद्ध झाले. तेव्हा ही बनावट इरादापत्रे रायगड जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली. आमची फसवणूक मोदींच्या उपस्थितीत झाल्याची भावना साऱ्या आगरी समाजाची झाली. या इरादापत्रांची वेदना रायगड-ठाणे जिल्ह्यात आगरी समाजात गाजली. ही फसवणूक समाजाच्या काळजाला भिडली. त्यामुळे मोदींच्या निषेध झाला. भाजपवगळता सारे पक्ष या निषेध बंडात होते.

आगरी-कोळी समाजातील प्रकल्पग्रस्तांची फसवणूक हा काही नवा विषय नाही. विकासासाठी सरकार जमिनी घेते आणि शेतकऱ्यांची कशी ससेहोलपट होते, हे बघायचे तर उरण परिसरात या. फिरा. लोकांशी बोला. ३१ वर्षांपूर्वी जेएनपीटी बंदरात आगरी-कोळी समाजाच्या जमिनी गेल्या. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उरण, पेण, अलिबाग या परिसरात जेएनपीटी, सिडको आणि अन्य सरकारी प्रकल्पांत लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. एकट्या जेएनपीटी बंदर आणि त्याला संलग्न प्रकल्पात ९५ गावांची जमीन सरकारने घेतली. ५० हजार हेक्टर जमीन या गावांतून सरकारने हस्तगत केल्याची सरकार दरबारी नोंद आहे.

जमीन गेली करायचे काय?
आगरी-कोळी समाजाने ३१ वर्षांपूर्वी अॅड. दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष सुरू केला. १९८४ साली या प्रकल्पग्रस्तांनी रक्तरंजित लढा दिला. त्यात गोळीबारात पाच जण हुतात्मे झाले. लाठीमारात हजारो लोकांचे रक्त सांडले. हजारो लोक तुरुंगात गेले. स्वत: दि.बा. पाटील यांच्यावरही लाढीमार करून त्यांना रक्तबंबाळ केल्याचे प्रकरण त्यावेळी महाराष्ट्रभर गाजले होते. या रक्तरंजित संघर्षानंतर सरकारने प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंड देण्याची योजना बनवली. पुनर्वसनाच्या कायदा केला. काही प्रश्न सुटले जरूर, पण काही तसेच लोंबकळले. इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक संघर्षात या रक्तरंजित लढ्याची आठवण केली जाते. आमची जमीन घेऊन सरकार आम्हालाच उन्हातान्हात संघर्ष करायला, रक्त सांडायला का लावते? हा इथल्या प्रकल्पग्रस्तांचा सरकारला सवाल अाहे. यावेळी तो मोदींना होता.

जेएनपीटी बंदरात साडेतीन हजार खातेदार शेतकऱ्यांची जमीन गेली, पण त्यांना साडेबारा टक्के भूखंड मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांचा संघर्ष ऐरणीवर आलाय. म्हणूनच त्यांनी मोदींचना काळे झेंडे दाखवले. गेल्या ऑगस्टमध्ये मोदींनी जेएनपीटी बंदरात येऊन ४० मिनिटे भाषण ठोकले होते. विकास कामांच्या घोषणांचे बार उडवले होते. यावेळी मात्र मोदी फक्त १५ मिनिटेच आले. प्रकल्पग्रस्तांना फक्त त्यांचे हेलिकॉप्टर आल्याचे आणि गेल्याचे दिसले. मुंबईतल्या कार्यक्रमात मोदी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. वाहतूकमंत्री नितीन गडकरीही काही बोलले नाहीत. त्याचा प्रकल्पग्रस्तांना राग आला आहे.

अगोदर खोटी इरादापत्रे दिली आणि आता पंधरा महिने होऊन गेले तरी प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यायचे नाव नाही. त्यामुळे आगरी-कोळी समाज पेटला आहे. आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष, कामगार नेते श्याम म्हात्रे हे मोदींविरोधात आंदोलन करण्यात अग्रभागी होते. ते म्हणतात, “समाजातील प्रकल्पग्रस्तांची प्रचंड फसवणूक झाल्याची भावना आहे. केंद्र व राज्य सरकार विरोधात प्रकल्पग्रस्त पेटून उठलेत. त्याला मोदींच्या या दौऱ्यात तोंड फुटले. सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या दुखण्याकडे लवकर लक्ष दिले नाही तर या भागात १९८४ सारखा रक्तरंजित संघर्ष बघायला मिळू शकतो. भाजपा सरकार आमचे प्रश्न सोडवण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांमध्ये फूट पाडत आहे. आजपर्यंत उरण-पनवेलचे सारे प्रकल्पग्रस्त दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढले. त्यांचा फोटो लावून सर्व जण एकोट्याने सरकारशी भांडत. यावेळी मात्र भाजपाने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना पुढे करून प्रकल्पग्रस्तांची भक्कम एकजूट तोडली आहे. संपूर्ण आगरी समाज, कोळी समाज आंदोलन तोडणाऱ्यांना माफ करणार नाही. दि.बा. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी रक्त सांडले होते. ते रक्त आम्ही वाया जावू देणार नाही. फूटपाड्यांना धडा शिकवू. सरकारला प्रकल्पग्रस्तांपुढे नमावेच लागेल. आमच्या सहनशिलतेचा अंत सरकारने बघू नये?”

अन्यायाच्या विरोधात लढणे हा आगरी-कोळी समाजाचा स्वभाव आहे. १९२०-२५ या काळात हा समाज इंग्रजांच्या विरोधात लढला. काही जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे त्यातून खूनही झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा आगरी समाजातील नेत्यांच्या केसेस लढवल्या. या समाजाचा हा लढण्याचा वारसा छत्रपती शिवरायांच्या काळापर्यत मागे नेता येईल. शिवरायांच्या मावळ्यांत, सैन्यात हा समाज अग्रभागी होता. मुळात स्वाभिमानी असलेली ही माणसे अन्याय झाला की, क्षणात पेटून उठतात. जिवाची पर्वा करत नाहीत.

या परिसरात एक म्हण प्रसिद्ध आहे-ऐनाचे भय ना, घेतल्या बिगर जाय ना! आम्हाला कुणाचे भय नाही. शेंडी तुटो वा पारंबी तुटो. आम्ही आमचा हक्क पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही, हा या प्रकल्पग्रस्तांचा बाणा आहे. त्यामुळेच आजपर्यंतचे संघर्ष या प्रकल्पग्रस्तांनी यशस्वीपणे लढवले. नवी मुंबईतील सिडकोच्या विरोधातही प्रकल्पग्रस्तांचे सतत लढे होतात. दररोज मोर्चे, उपोषणे करावी लागतात. सिडको प्रशासनाच्या मनमानी विरोधात प्रकल्पग्रस्त नेहमी रस्त्यावर येतात. एकदा सिडकोचे एम.डी. संजय भाटीया म्हणाले होते, मी नक्षलग्रस्त भागात कलेक्टर होतो. मला नक्षलवाद्यांशी लढण्याचा अनुभव आहे. पनवेल-उरण प्रकल्पग्रस्तांशी सामना करायला मला अवघड जात नाही. भाटीया यांच्या या बोलण्यामुळेही प्रकल्पग्रस्त संतप्त आहेत. उरणचे जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर एकदा बोलताना म्हणाले, आम्ही आमच्या प्रश्नांवर लढताना मेटाकुटीला येऊन वैतागून नक्षलवादी व्हावे असे तर भाटीया सुचवत नाहीत ना? भाटीया यांना आमचे प्रश्न सोडवायचे आहेत की नाहीत? ते आगरी-कोळी समाजातील तरुणांनी हिंसक व्हावे असे का टोमणे मारत आहेत. आता आम्ही मोदींना फक्त काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला आहे. यापुढे दाद देणार नसाल तर मोठे बंड उभे राहिल. भाजप सरकारला ते महागात पडेल. आम्ही लढून मरू पण अन्याय गिळणार नाही?

दि.बा. पाटील यांच्या खांद्याला खादा लावून जे लढले त्यांचे श्याम म्हात्रे प्रतिनिधी आहेत. वैजनाथ ठाकूर हे तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत. हे दोन्ही नेते जे सांगतात ती आगरी-कोळी समाजाची बंडाची भावना आहे. सततच्या अन्यायातून ती तयार झाली. महाराष्ट्रात इतर शेतकऱ्यांनी अन्याय सहन केले. इतर प्रकल्पग्रस्तांनी नमते घेतले. पण गेली ३१ वर्षे उरण-पनवेलचे शेतकरी न दबता, न नमता बंडाचा झेंडा फडकवत ठेवत आहेत. शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका, मोडून पडू नका. नमू नका. घरात रडू नका, रस्त्यावर या. बंड उभे करा, असा त्यांचा सांगावा आहे. मोदींना काळे झेंडे दाखवून पुन्हा एकदा या शेतकऱ्यांनी आपल्या लढ्याचा वारसा सिद्ध केला आहे.

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : १३/१०/२०१५

Monday, October 12, 2015

नूरजहाँच्या बाळा, त्या महिलांनी विखाराला हरवले











आजच्या ते आणि आम्ही अशी फाळणी झालेल्या काळात अॅण्टॉप हिलच्या काही महिला भारतातल्या चांगुलपणाच्या प्रतिनिधी आहेत. अख़लाक़चा खून, दानिशच्या स्वप्नाचा मृत्यू, खानचे गाय वाचवणे, अॅण्टॉप हिलच्या हिंदू महिलांचा चांगुलपणा हे आपल्या देशातले संमिश्र वास्तव आहे. जगप्रसिद्ध गायिका शकिराचाही असाच जगाला सांगावा आहे.

नूरजहाँच्या बाळा,तीन दिवसांपूर्वीच तुझा जन्म झालाय. तू जन्माला आला, त्याची बातमी झाली. असे खूप कमी जणांच्या आयुष्यात घडते. मुंबईच्या अॅण्टॉप हिल परिसरातून तुझी आई- नूरजहाँ जात होती. अचानक तिला रस्त्यातच बाळंतकळा येऊ लागल्या. आता काय करावे? जवळच्या चाळीतल्या शहाण्या महिल्या धावल्या. त्यांनी तुझ्या आईला समोरच्या गणेश मंदिरात नेले. तिथे सुखरूप बाळंतपण केले. बाळ-बाळंतीण सुखरूप बघून सर्व महिलांनी मंदिरात आनंदोस्तव साजरा केला. एक महिला म्हणाली, छान बाळ आहे, गणेशच जन्माला आला की!

हिंदू महिला मुस्लिम महिलेचे बाळंतपण करताहेत... जन्माला आलेल्या तुला देवाच्या रूपात पाहताहेत. किती विलोभनीय घटना म्हणायची! हा आपल्या देशाचा खरा स्वभाव आहे. तो वारंवार दिसून येतो. सामान्य माणूस जात, धर्म, वर्ग, लिंग, भाषा या भेदांपलीकडे जाऊन दररोज जगतो. जशा अॅण्टॉप हिलच्या महिला जगल्या, वागल्या. असे चांगले वागल्याबद्दल त्यांचे कुणी गौरवसोहळे नाही करणार. त्यांनाही त्याची इच्छा नाही. गरज तर अजिबात नाही. चांगले वागणे हा सामान्य माणसे स्वत:ला मिळालेला मागच्या पिढ्यांचा वारसा समजूत पुढे चालवत असतात.

बाळा, तुझ्या जन्माच्या बातमी अगोदर आठवडाभरापूर्वी एक भयंकर घटना घडून गेली आहे. आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लापासून ५० किलोमीटर अंतरावर बिसाहडा गावात ५२ वर्षांच्या मोहम्मद अख़लाक़ यांची त्यांच्या घरात बिफ शिजतेय या अफवेवरून अमानवी पद्धतीने हत्या झाली. त्याची चिथावणी शेजारच्या मंदिरातल्या लाऊडस्पीकरवरून दिली गेली. तुझा तर जन्मच मंदिरात झाला. किती मोठ्या विसंगतीत आपला देश जगतोय नाही? मुंबईतल्या अॅण्टॉप हिलच्या मंदिरात जीव जन्माला येतो आणि बिसाहडाच्या मंदिरात जीव घेण्याच्या कारस्थानाचा पुकारा होतो! हजारो माणसे एक दिलाने, निर्धाराने एक खून करतात. मंदिर ही देवाशी संवाद करण्याची जागा. इथे ती आपसातही हितगूज करतात...देवाची तशीच अपेक्षा असते. मुंबईतल्या मंदिरात चांगले काम झाले. पण बिसाहडाच्या मंदिरात वाईट घोषणा का झाली? हे कोण घडवते आहे? त्यासाठी कुणी विष पेरणी केली आहे?

बिसाहडा गाव उत्तरप्रदेशात येते. त्याच राज्यातल्या राजधानीच्या शहरात, लखनऊमधील एक घटना मोठी बोलकी आहे. इथे ऐशबाग हा हिंदूबहुल शहरी विभाग आहे. या भागात शीतल खेडा नावाच्या परिसरात शुक्रवारच्या दिवशी एक गीर गाय विहिरीत पडली. विहीर जुनाट, गाळाने भरलेली. लोकांनी क्रेन मागवली. गाय विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, पण जमले नाही. गाय विहिरीतल्या गाळात तडफडत होती. कुणी विहिरीत जाण्याचे धाडस दाखवेना. जवळून शुक्रवारच्या नमाज़साठी एक मुस्लिम तरुण जात होता. त्याचे नाव पेंटर मोजकी खान. तो गायीची परिस्थिती बघून थांबला. त्याने अंगावरचे कपडे उतरवले आणि क्रेनच्या मदतीने अंगाला पट्टे बांधून विहिरीत उतरला. गाय तडफडत होती. गायीची शिंगे त्याला खरचटली. थोडी जखमही झाली. धीर धरून त्याने गायीला चुचकारले. पट्ट्याने बांधले. बाहेर काढले. अर्धा तास हा खटाटोप चालू होता. खानची शुक्रवारची नमाज टळली, पण गाय वाचली.

गाय वाचवल्याबद्दल गौरव करावा अशी मोजकीची इच्छा नाही. त्यासाठी त्याने हे केलेलेही नाही. आपल्या समाजाने चांगुलपणाचा जो वारसा त्याच्यात पेरलाय, तो या घटनेतून उगवलेला दिसला एवढेच. अशी सर्व धर्मातली असंख्य अनाम माणसे दररोज सभ्यपणे वागताना दिसतात. त्याच्या ना बातम्या होतात, ना गौरवसोहळे. पण या देशाचे तेच संचित आहे. हा चांगुलपणा वाढवण्यासाठी लोक का पुढे येत नाहीत? उलट या संचिताला नख लावायचे काम काही लोक करत आहेत, त्यांच्यापासून सावध राहायला हवे. बिसाहडात माणसे हिंस्त्र झाली. त्यातून विद्रूप घटना घडली. आपल्या देशाचा विखारी चेहरा जगभर गेला. त्याला जबाबदार कोण?

बिसाहडात मारला गेलेल्या अख़लाक़विषयी आणखी एक गोष्ट. हा माणूस काही ऐरागैरा नव्हता. त्याने खस्ता खाऊन आपली मुले शिकवली. मोठा मुलगा मोहम्मद सरताज़ याला भारतीय हवाई दलात पाठवले. तिथे तो तांत्रिक खात्यात मोठ्या पदावर आहे. टेक्नीशियन म्हणून त्याच्याविषयी इंडियन एअर फोर्सचे प्रमुख चीफ मार्शल अरूप राहा यांना आस्था आहे. सरताज़च्या वडिलांना असे क्रूरपणे मारले गेले याचे दु:ख अरूप राहा यांनी जाहीरपणे व्यक्त केले. अख़लाक़ बरोबर त्यांचा छोटा मुलगा दानिश यालाही जमावाने घायाळ होईस्तोवर मारले. दानिश शिकत होता. त्यालाही भावाच्या पावलावर पाऊल ठेवून हवाई दलात भरती व्हायचे होते. त्याची तो तयारी करत होता. दानिश आता हॉस्पिटलात जगण्या-मरण्याची लढाई लढतोय. वडिलांचे डोळ्यादेखत मारले जाणे, स्वत:च्या आयुष्याच्या स्वप्नाचा चुराडा होत असताना दानिश कॉटवर पडून काय विचार करत असेल? दानिशला आता हवाई दलात घेतले जाईल काय? त्याचे स्वप्न मरेल की साकार होईल? अशी किती स्वप्न अजून खुडली जाणार आहेत?

बाळा, हे लिहिताना जगप्रसिद्ध गायिका शकिरा हिने आयलान कुर्दी आणि त्याच्या भावाला श्रद्धांजली वाहण्यासाठी गायलेले गाणे आठवतेय. संयुक्त राष्ट्र संघाच्या ७० व्या अधिवेशनात हे गाणे तिने गायले. शकिरा ही युनिसेफची राजदूत आहे. जगभरातल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी ती काम करते. हे इमॅजिन नावाचे गाणे जॉन लेनॉन या कवीने लिहिले आहे. ते असे -
कल्पना करा की, स्वर्ग नाहीए
आपल्या बुडाखाली नरकही नाहिए
वरती फक्त मुक्त आकाश आहे
आपल्याला भराऱ्या घ्यायला
कल्पना करा, सर्व लोक
‘आज’ साठी भरभरून जगताहेत.

कल्पना करा, कोणताही देश नाहीए
आणि धर्मही नाहीए
कुणासाठी मरायचे नाहीए
कुणाला कुणासाठी मारायचेही नाहीए

कल्पना करा, सर्व लोक खुशीत,
मस्त शांततेत जगताहेत.
तुम्ही म्हणाल, मी स्वप्नाळू आहे
पण मी काही एकटा नाहीए
मला आशा आहे,
एक दिवस तुम्हीही माझ्या सोबतीला याल
आणि त्यादिवशी जग एक होईल.

कल्पना करा, कुणी कुणाचे मालक नाहीए
सर्व स्वच्छंदपणे वावरतील
हाव आणि भूकेचा नायनाट होईल
बंधूभाव ओथंबेल
कल्पना करा, सर्व लोक पृथ्वीवर
होतील सारखेच हिस्सेदार
तुम्ही पुन्हा म्हणाल, हा वेडा स्वप्नाळू आहे
पुन्हा सांगतो, मी एकटा नाहीए
पक्की आशा आहे तुम्ही सोबत याल
एक दिवस ते घडेल
आणि अख्खे जग एक होईल
एकमय जगेल.

हे गाणे गाताना शकिरा गदगदून गेली होती. हे गाणे युट्युबवर आपल्याला ऐकता येते. त्या बापुड्या दोन वर्षांच्या कोवळ्या मुलाचा काय दोष होता? सिरियन निर्वासिताच्या पोटी तो जन्मला. कुटुंबाचे पोट भरेना म्हणून आसरा देईल त्या देशाकडे मदत मागायला निघालेल्या निर्वासितांच्या लोंढ्यात आयलान आणि त्याचा भाऊ आईसोबत एका बोटीतून निघाले होते. अपघात झाला. आईसह दोघेही भाऊ बुडून मेले. आयलानचा मृतदेह तुर्की देशाच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहून आला. त्या हृदयद्रावक घटनेची आठवण, त्यातले दु:ख या गाण्याने पुन्हा जगाच्या वेशीवर टांगले गेले आहे.

बाळा, अख़लाक़चा खून, दानिशच्या स्वप्नाचा मृत्यू, खानचे गाय वाचवणे, अॅण्टॉप हिलच्या हिंदू महिलांचा चांगुलपणा हे आपल्या देशातले संमिश्र वास्तव आहे. या वास्तवात विखारीपणा आज बळकट दिसतोय. या विखारीपणाला चाप कोण लावू शकेल? अख़लाक़ यांच्या सतरा वर्षांच्या मुलीने बापाला मारणाऱ्या विखारी जमावाला भिडणारा प्रश्न विचारला होता, आमच्या घरात बिफ शिजत नव्हते हे सिद्ध झाले, तर माझा बाप मला परत आणून द्याल काय? ही मुलगी विखाराला भिडली जरूर, पण बापाला वाचवू शकली नाही. कुणी सांगावे, तिला योग्य साथ मिळती तर विखाराचा पराभवही झाला असता. पण ती हरली. मात्र अॅण्टॉप हिलच्या महिला जिंकल्या. त्यांनी आजच्या ते आणि आम्ही अशी फाळणी झालेल्या काळात नूरजहाँला साथ दिली.बाळा, त्या महिला भारतातल्या चांगुलपणाच्या प्रतिनिधी आहेत. ते विखाराला कधीही जिंकू देणार नाहीत.

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०६/१०/२०१५

Thursday, October 1, 2015

गांधी, बाबासाहेबांच्या माणसांनो, ‘तमाशा’ कराच!













गांधींचा सामान्य हिंदू माणूस जागा असेल, तर नथुरामींची पीछेहाट ठरलेली असते. बाबासाहेबांचा संविधानावर प्रेम करणारा कार्यकर्ता सक्रिय असेल तर अन्याय करणाऱ्यांची दातखीळ बसते. त्यांची अन्यायाची भाषा बोलण्याचीदेखील हिंमत होत नाही. हे यापूर्वी दिसले, घडले आहे. आज पुन्हा गांधींचा सामान्य माणूस आणि बाबासाहेबांचा संविधानवादी कार्यकर्ता यांना पुढे यावे लागेल. त्यासाठी गांधी, बाबासाहेबांच्या माणसांनो, राजकीय तमाशा करून दाखवण्याची वेळ आली आहे.

आम्हाला कमी समजू नका. तुम्ही रक्तरंजित लढाईची भाषा करत असाल, तर आमच्या बाजूने डावे नक्षलवादी आहेत.
- अॅड. प्रकाश आंबेडकर

कट्टरवादी शक्तींचा वैचारिक प्रतिवाद करता येणे शक्य नाही. त्यांना विचार करणे ही प्रक्रियाच मान्य नाही. त्यांचा बंदोबस्त झाला नाही, तर महाराष्ट्राचा पाकिस्तान बनेल.
- श्याम मानव

या दोन प्रतिक्रिया बोलक्या आणि गंभीर आहेत. त्या मोठ्या अस्वस्थ वास्तवातून आल्या आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर पानसरे हत्या प्रकरणातले संशयित पकडले गेले. त्यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषदा रंगल्या. वकिलांचे ताफे उभे राहिले. त्या वकिलांचे दैनिकांत फोटेसेशन दिसले. मुलाखती, चर्चा यातून, माध्यमांत खुनाचे खुलेआम समर्थन सुरू झाले. विचार मांडणे आणि धमक्या देणे यांतले अंतर मिटले. ज्या आदरणीयांचे खून झाले, त्यांचा उल्लेख ‘आरेतुरे’ने करून जाहीर अवमान केला गेला. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि मानव यांच्या प्रतिक्रियांनी पुरोगामी चळवळीसमोर काय वाढून ठेवलेय त्याची दिशा स्पष्ट केली.

‘आमच्याकडे डावे नक्षलवादी आहेत’ किंवा ‘महाराष्ट्राचा पाकिस्तान बनेल’ या दोन्ही प्रतिक्रियांपैकी पहिली प्रतिक्रिया खचलेल्या पुरोगामी चळवळीला लढण्याचा विश्वास देण्यासाठी महत्त्वाची आहे. दुसरी प्रतिक्रिया आपण लढलो नाही, तर काळ मोठा बाका आहे याची जाणीव करून देणारी आहे. 

कट्टरवादी शक्तींना रक्तरंजित लढाई हवीच असते. लोकशाही कायद्याच्या राज्यात कट्टरवाद्यांचा मुकाबला कट्टरवादाने होणार नाही. गोळीला उत्तर गोळी हे कधी नसतेच. आता खरी लढाई राजकीय आहे. ही लढाई आक्रमक पद्धतीने, जनतेचा अजेंडा सोबतीला घेऊन लढावी लागेल. पुरोगामी चळवळीला भाबडे विचार गुंडाळून ठेवावे लागतील. माणूस मारून विचार मरत नाही, हा भोळा आशावाद झाला. माणसेही मारता येतात आणि विचारांचीही पीछेहाट करता येते हा इतिहास आहे. हे होऊ द्यायचे नसेल, तर कणखर राजकीय लढाया कराव्या लागतात. त्या लढाईची महाराष्ट्रात वेळ आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र उठवावा लागेल.

हे कसे घडेल?
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी जे संघर्ष उभे केले त्यातून सूत्र सापडेल. सामान्य हिंदू माणूस जेव्हा गांधींच्या बाजूने उभा होता तेव्हा गांधी हत्या करून नथुरामी शक्तीने स्वत:चा घात करून घेतला होता. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात मोठा वैचारिक झंझावात उभा राहिला. त्याने नथुरामी शक्तींना तोंड लपवण्याची वेळ आणली. लोक सजग असतील, तर कट्टरवादी दळणातल्या खड्यासारखे बाजूला पडतात. अर्थात पुस्तके लिहिणे, व्याख्याने देणे, नथुरामच्या जयंत्यामयंत्या साजऱ्या करणे, अस्थिपूजा करणे, पुतळे उभे करण्याची भाषा करणे, मंदिरे उभे करण्याच्या घोषणा करणे, नथुरामचे नाटक सादर करणे या कृतीतून गांधीहत्येचे छुपे समर्थन जरूर सुरू होते. पण त्या कारवायांचा आवाज क्षीण होता. समाजात त्याला प्रतिष्ठा नव्हती. नथुरामी चोरचिलटासारखे वावरत होते. आता पुन्हा नथुरामी शक्तींनी उभारी घेतली आहे. कट्टरवादी शक्ती धर्माचे नाव घेतात. पण त्यांना समाजात अधर्म पेरायचा असतो. ते लोकांचे भले करण्याचे दावे करतात, पण त्यांना लोकांचे जीणे कठीण करून सोडायचे असते. जेव्हा जेव्हा कट्टरवादी शक्ती वाढतात तेव्हा लोकांचे पोटापाण्याचे प्रश्न दडपून टाकणे हा त्यांचा अजेंडा असतो, हे वेळोवेळी दिसून आले आहे. म्हणूनच कट्टरवाद्यांनी दुष्काळात लोकांना मदत कधी केली नाही. पण पुण्यात मानाचे गणपती पाणीटंचाईमुळे हौदात बुडवणे म्हणजे पाप होय अशी आरोळी ठोकली. गणपती हौदात बुडवू नका, म्हणून पुण्यात आंदोलन झाले. कट्टरवादी संघटना लोकविरोधी असतात, हे जनतेला समजावून सांगावे लागेल. कट्टरवादी संघटनांच्या कारवायांनी रोजगार, नोकऱ्या, दुष्काळ, शेतीमालाला हमी भाव, शिक्षण, आरोग्य, घर हे कळीचे प्रश्न बाजूला पडतात. हे लोकांना ज्या दिवशी कळेल त्या दिवशी कट्टरवाद्यांची ताकद क्षीण होईल.

गांधींचा सामान्य हिंदू माणूस जागा असेल, तर नथुरामींची पीछेहाट ठरलेली असते. बाबासाहेबांचा संविधानावर प्रेम करणारा कार्यकर्ता सक्रिय असेल तर अन्याय करणाऱ्यांची दातखीळ बसते. त्यांची अन्यायाची भाषा बोलण्याचीदेखील हिंमत होत नाही. हे यापूर्वी दिसले, घडले आहे. आज पुन्हा गांधींचा सामान्य माणूस आणि बाबासाहेबांचा संविधानवादी कार्यकर्ता यांना पुढे यावे लागेल. त्यासाठी गांधी, बाबासाहेबांच्या माणसांनो, राजकीय ‘तमाशा’ करून दाखवण्याची वेळ आली आहे.

तमाशा हा महाराष्ट्रीय माणसाच्या जीवनशैलीत भिनलेला शब्द आहे. हा केवळ मनोरंजनाचा लोककला प्रकार नाही. आजही गावात जा. काही वेगळे करून दाखवायचे असेल, तर ते सुचवताना माणसे म्हणतात, तमाशा करून दाखवतो, तमाशा घालतो, तमाशा होऊ द्याच. इतिहासात ‘तमासे करून दाखवा’ म्हणजे ‘पराक्रम घडवा’ या अर्थाने शब्दयोजना करण्यात आली आहे. छोटी-मोठी वेगळी गोष्ट करण्यापासून तर पराक्रम गाजवण्यापर्यंत ‘तमाशा’ करा असे म्हटले गेलेले दिसून येते. पूर्वी राजे, सरदार ‘तमाशा’ हा शब्द वापरत. लढाया, स्वाऱ्या करायला जाणाऱ्या शूर सरदारांना इतर म्हणत ‘तमासे’ करून या म्हणजे पराक्रम गाजवून या, यशस्वी होऊन या. तमाशातल्या वगनाट्यात चांगल्याचा विजय, वाईटाचा पराभव दाखवला जातो. गणगौळणी, पोवाड्यात कृष्णांच्या पराक्रमाची वर्णने असतात. असा तमाशा करून दाखवण्यासाठी महाराष्ट्राची सद्यस्थिती अनुकूल आहे. राजकीय, सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते अस्वस्थ तर आहेतच. विचारवंत, लेखक, कलाकारही बैचेन आहेत. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गीची गोळी त्यांनाही चाटून गेली आहे. राजकीय क्षेत्रात प्रकाश आंबेडकरांसारखेच आमदार कपिल पाटील नथुरामी शक्तीविरोधात आहेत. पुण्यात डॉ. अभिजीत वैद्य, अजित अभ्यंकर आहेत. औरंगाबादला भालचंद्र कांगो, सोलापूरला नरसय्या आडम मास्तर आहेत. नाशिकला डी. एल. कराड आहेत. आणखी शेकडो लढाऊ नेते, कार्यकर्ते राज्यात विविध ठिकाणी कंबर कसून आहेत. गरज आहे, या सर्वांची मोट बांधण्याची.

महाराष्ट्रात कट्टरवाद्यांशी लढताना बिहारपासून काही धडे घेता येतील. बिहारात विधानसभेचा रणसंग्राम सुरू आहे. या संग्रामात नीतिश कुमारांनी आखलेली रणनीती उल्लेखनीय आहे. नीतिश कुमारांनी आरक्षणविरोधी आवाज काढणाऱ्यांना गप्प केले. ते कशाच्या बळावर? नीतिश कुमारांमागे मध्यम जाती, मागास, अल्पसंख्यांक यांची भक्कम एकजूट उभी दिसते. त्या एकजुटीपुढे आरक्षणाचा फेरविचार करणाऱ्यांची भाषा बंद होते. खोटा प्रचार करणारे उघडे पडतात. हे केवळ सामान्य हिंदू माणूस नीतिश कुमारांना बळ देतो म्हणून घडते आहे. बिहारसारखी मध्यम जाती, मागास, दलित, अल्पसंख्यांकांची फळी महाराष्ट्रात उभी केली तर राजकीय ‘तमाशा’ जरूर होईल. गांधी, बाबासाहेबांच्या माणसांना तो करावाच लागेल. अन्यथा फार मोठी किंमत चुकवावी लागेल.

गांधी जयंती तोंडावर आहे. राजकीय तमाशा करायचा, तर गांधी किती उपयुक्त आहे बघा. विज्ञानवाद, समाजवाद, निधर्मीवाद या अपूर्व कोलाहलात भारताचा मूळ प्राणस्वर जाणला पाहिजे. कबीर, तुलसी, मीरा, नामदेव, तुकाराम, नरसी मेहता, संत एकनाथ, स्वामी विवेकानंद हा तो प्राणस्वर. गांधींनी हाच प्राणस्वर विसाव्या शतकात रुजवला. साने गुरुजी, गाडगे महाराज, प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर हे याच कुळातले आहेत. गांधींच्या या कुळात सामान्य जनतेला ‘स्व’ सापडतो. गौतम बुद्ध त्या कुळात भेटतो.

तमाशा करायचा, तर गांधींची विलक्षण स्ट्रॅटेजी समजून घेतली पाहिजे. टिळक म्हणत, ‘शठं प्रतिशाठ्यं’. गांधी म्हणत, ‘शठं प्रति सत्यं’. गांधी टिळकांचा राजकीय संघर्ष पुढे नेत होते. पण नामदार गोखले माझे राजकीय गुरु आहेत, असं म्हणत होते. चळवळीची प्रेरणा जहाल. पण भाषा, प्रतिमा वगैरे सामग्री सौम्य, सभ्य.

या विलक्षण स्ट्रॅटेजीने ‘तमाशा’ करून दाखवता येईल. असा तमाशा झाला, तर तख्ताचीही उलटपालट होते.



राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २९/०९/२०१५