Monday, October 29, 2012

पाकिस्तानला बदलवणारी मुलगी

















मलाला झियाउद्दीन युसूफझाई या १५ वर्षाच्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलीवर शाळेतून परताना पाकिस्तानातल्या स्वात खोऱ्यात तालिबान्यांनी गोळ्या झाडल्या. मळला डोक्यात गोळ्या लागल्याने बेशुद्ध झाली. अगोदर पाकिस्तानात आणि आत्ता इंग्लडमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत.

मृत्यूशी आजही झूंज देणारी मळला आहे तरी कोण? जगभरच्या लोकांचं कुतूहल जागृत झालं.

पाकिस्तानच्या स्वात खोर्यात मिंगोरा हे मलालाचं गाव. वयाच्या १२व्या वर्षापासून मलालाने स्वात खोर्यात कडव्या तालिबानींचा नंगानाच पहिला. साल होतं २००८-०९. तालिबान्यांनी स्वात खोऱ्यात मुलींच्या शिक्षणावर बंदीच फर्मान काढलं. मुलींनी टी.व्ही. बघायला नाही. पुस्तक वाचायची नाहीत. कॉम्पुटर, इंटरनेट वापरायचं नाही. मुली बिघडू नयेत म्हणून आम्ही हे फर्मान काढलं, असा तालिबान्यांचा दावा आहे.

या फर्माना विरोधात मलालाने आपल्या शाळा चालवणाऱ्या, कवी असलेल्या वडिलांना प्रश्न विचारून परेशान केलं. सुधारलेल्या विचाराच्या वडिलांनी मलाला हिला तालीबान्याविरोधात लढल्याच बळ दिलं. मुलींच्या स्वातंत्र्यावर, शिक्षणावर बंदी घातली गेली तरी कुणी बोलत नव्हतं. तेव्हा मलालाने प्रश्न विचारला शाळेत जाण्यात काय पाप आहे? स्वत:पुरता मलालाने फर्मानाचा विरोध कॉम्पुटर वापरायला सुरवात केली. ती इंटरनेट स्याव्ही बनली. तालिबान्यांच्या अत्याचारांच्या कथा, शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलींच्या कहाण्या तीन गुल मकाई या टोपणनावाने ब्लॉगवर लिहिल्या आणि थेट बीबीसीच्या ब्लॉगवर पाठवल्या. त्या झळकल्या आणि जगभर करोडो तरुणींनी, स्त्री-पुरुषांनी वाचल्या. तेव्हाच मलाला पाकिस्तानातल्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींची प्रतिनिधी बनली होती. मलालाच्या या कामामुळे २०११ साली आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासाठी तिला नामांकन मिळालं. पुरस्कार मिळू शकला नाही, पण पाकिस्तान सरकारने तिला खास शांतता पुरस्कार दिला आणि तिच्या कामाला सलाम केला.

मलाला म्हणत असे, मला राजकारणात जायचं आहे. समाज बदलायचा आहे. तिचे आदर्श होते, महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यासाठी लढलेले सरहद्द गांधी उर्फ खान अब्दुल गफार खान आणि बेनझीर बुत्तो. सरहद्द गांधी म्हणजे भारत पाकिस्तानच्या फाळणीला शेवटपर्यंत विरोध करणारा, फाळणीनंतर  २० वर्षे पाकिस्तानात राहून आपल्या पश्तून संस्कृतीसाठी शेवटपर्यंत लढणारा पठाणी सिंह. बेनझीर भुत्तो म्हणजे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पाकिस्तानाला आधुनिक बनवू पाहणारी आणि भारत द्वेषापासून दूर ठेवण्याचा विचार मांडणारी, शेवटच्या क्षणापर्यंत दहशतवादाविरुद्ध लढलेली सिंधी वाघीण. या दोघांचा वारसा उराशी बाळगणारी मलाला वेगळी ठरली यात नवल ते काय?

मृत्यूशी झुंज देणाऱ्या मलाला मागे साऱ्या पाकिस्तानातल्या मुली, तरुण उभे राहिले. जगाने तिची पाठराखण केली. आपल्या मुंबईच्या बगलेत असणाऱ्या मुब्र्यामध्ये सहाशे मुलींनी रस्त्यावर येऊन मलालाचा जीव वाचवा म्हणून प्रार्थना केली. मलालाच्या शूर कृतीमुळे ती केवळ पाकिस्तानातीलच नव्हे तर जगातली बहाद्दूर मुलगी ठरली आहे. तिच्या या लढाईने पाकिस्तानला बदलून टाकलं आहे.

- राजा कांदळकर (rajak2008@gmail.com)

सीमोल्लंघन आपलं आणि व्हेनेझुएलातलं!
















दसरा या सणाला आपल्या परंपरेत आगळंवेगळं महत्व आहे. चांगल्या विचारांचा विजय होतो. वाईटाचा नाश होतो. याची आठवण देणारा हा सण आहे. नुस्ती आठवणच नाही तर या दिवशी नव्या गोष्टी साकार करण्यासाठी उभं राहण्याचा निर्धार करायची. पुढे जायचं. नव्याचा ध्यास घ्यायचा. विजयी होण्याकडे घोडदौड करायची असा याचा अर्थ.

हा दसरा आज आपल्या देशाच्या जीवनातही महत्वाचा ठरणार आहे. अण्णांनी जनलोकपालबरोबर निवडणूक सुधारणांचं आंदोलन उभं करण्याची हाक दिली आहे. त्यासाठी जमवाजमव सुरु केली आहे. नवे साथीदार जोडले आहेत. या दसऱ्याला भ्रष्ट शक्तीचं दहन करायचं आणि नव्या जोमानं अण्णांना साथ द्यायचा निर्धार करायचा आहे. हे एक नवं सीमोल्लंघन या वर्षीच्या दसऱ्याच्या निमित्ताने ठरेल. देशभर गावागावात, शहाराशहरात ते व्हावं. लोक अशा सीमोल्लंघनाला तयार आहेत.

आणखी एक सीमोल्लंघन होत आहे. व्हेनेझूएला या लॅटिन अमेरिकेतील देशात ते होतंय. तिथं नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यात समाजवादी नेते हुगो चावेझ हे पुन्हा निवडून आले. आपल्या विरोधकांच्या सुमारे दहा टक्के मतांनी त्यांनी पराभव केला. चावेझ याच्याबद्दल थोडंस. तरुणपणी लष्करात जवान असलेले चावेझ आत्ता ५४ वर्षाचे आहेत. गेली १४ वर्षे ते व्हेनेझूएला या देशाच्या जडणघडणीत महत्वाचा रोल बजावत आहेत. १५ वर्षापूर्वी लष्करातून बाहेर पडून त्यांनी राजकारणात भाग घेतला. समाजवादी विचारांनी देशात चळवळ केली. हा समाजवादी विचार जुनाट नव्हे. तो आहे एकविसाव्या शतकाचा. त्यामुळे तो तरुणांना आवडला. तरुणांनी व्हेनेझूएलात चावेझच्या नेतृत्वाखाली गरिबांची क्रांती केली. सत्ता गरिबांसाठी राबवली. देशाची सत्ता मिळाल्यावर चावेझ यांनी काही धडक निर्णय घेतले. व्हेनेझूएला हा तेल उत्पादक देश. पण एकेकाळी तेलातील निर्माण होणारी संपत्ती धनदांडग्यांच्या खिशात जाई. काही अमेरिकेच्या कपाटात जाई. चावेझने तेलाचा पैसा गरिबांच्या योजनेकडे वळवला. त्यामुळे दारिद्र्यात लक्षणीय घट झाली. चावेझने आरोग्य आणि शिक्षण मोफत केलं. पालकांनी मुलगा फक्त शाळा, कॉलेजात नेऊन घालायचा. त्याला हवं ते शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची. खाजगी शाळा नाहीत की भरमसाठ फी उकळणाऱ्या शिक्षणसंस्था या देशात नाहीत. आजारी पडलेल्या माणसाने दवाखान्यात जायचे, त्यावर योग्य ते उपचार करण्याची जबाबदारी सरकारची. असं सामान्य माणसाला दिलासा देणारं वातावरण या देशात आहे. चावेझ यांनी अनेक उद्योगांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यामुळे गरिबांच्या घरात आनंद भरला. धनिकांचा मात्र जळफळाट झाला.

धनिक भांडवलदार चावेझला का विरोध करतात?

चावेझ येण्याअगोदर व्हेनेझूएला हा देश अमेरिकेच्या पंजाखाली दबून काम करी. अमेरिका सांगेल ती पूर्वदिशा. अमेरिकेची दादागिरी जगभर जशी चालते तशी लॅटिन अमेरिकेतही चाले. अमेरिकेच्या या दादागिरीविरोधात चावेझने तांबूस लाट निर्माण केली. २१ व्या शतकातल्या समाजवादाचा नारा दिला. चावेझची तांबूस क्रांती यशस्वी झाली.

आत्ताच्या निवडणुकीत चावेझला लोळवण्याचा अमेरिकेने आणि त्यांच्या व्हेनेझुएलातल्या देशी भांडवलदार बगलबच्चानी अतोनात प्रयत्न केला. सर्व श्रीमंत वर्ग चावेझच्या विरोधात गेला. व्हेनेझुएलातली वर्तमानपत्रं आणि न्यूज channels  त्याच्या विरोधात होते. पण गरिबांनी, तरुणांनी, महिलांनी त्याची साथ सोडली नाही. तो विजयी झाला. 

व्हेनेझूएलात चावेझच्या विजयाने नवं सीमोल्लंघन झालं.

व्हेनेझूएलात आपल्या देशासारखेच भाववाढ, भ्रष्टाचार, गुन्हेगारी असे प्रश्न आहेत. अध्यक्ष चावेझसमोर ही आव्हानं आहेत. त्याचे विरोधक पूर्वीपेक्षा जास्त संघटीत झालेत. त्यात चावेझला कॅन्सर झालाय. चौदा वर्षे तो आव्हानांचा मुकाबला करतोय. विविध प्रश्न सोडवतोय.

जगभर गरिबांची बाजू लंगडी पडत चालली आहे. धनदांडगे, शिरजोर आहेत. अशा काळात गरीबांचा झेंडा खांद्यावर घेऊन लढणारा एक नेता म्हणून चावेझ खंबीरपणे उभा आहे.

या दसऱ्याच्या निमित्ताने चावेझकडे, त्याच्यामागे उभे राहणाऱ्या तरुणांकडे अपेक्षेने पाहणं गैर ठरणार आहे.

- राजा कांदळकर  (rajak2008@gmail.com)

Thursday, October 11, 2012

स्वप्न पाहिलेला माणूस!



दूध न आवडणाऱ्या इंजिनिअर माणसानं दूध क्रांती करावी. केरळातल्या मल्याळी भाषा बोलणाऱ्या ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या मुलानं म. गांधींच्या गुजराथी समाजात 'अमूल डेअरी' काढावी. आपल्या देशाला जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवण्याचं स्वप्न बघावं. त्या स्वप्नासाठी वयाची ९० वर्षे रात्रंदिन खपावं. हे सारंच अदभूत आणि अलौकिक असं आहे.

असं स्वप्नवत जीवन जगणारा डॉ. व्हर्गीस कुरीयन हा माणूस होताच तसा अदभूत. त्यांचा जन्म केरळातील कोझीकोड येथे २६ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला . चेन्नईतील लोयोला कॉलेजातून ते पदवीधर झाले. नंतर इथल्याच गिंडी कॉलेज ऑफ इन्जिनीअरिन्ग  मधून पदवी घेतली. जमशेदपूर येथे टिस्कोमध्ये काम केले. त्यावेळी त्यांना दूग्ध अभियान्त्रीकेच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळाली. बंगळूर च्या अनिमल हजबंडरी या संस्थेत प्रशिक्षण घेऊन ते अमेरिकेला गेले. तिथं त्यांनी मिशिगन विद्यापीठातून मकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये मास्टर्स पदवी घेतली. त्यात त्यांचा दुग्ध अभियांत्रिकी हा विषय होता.

एवढं शिक्षण घेऊनही त्यांना अमेरिकेची स्वप्नाळू दुनिया आकर्षून घेऊ शकली नाही. ते अमेरिकेत स्थायिक होऊ शकले असते. पण त्यांना स्वदेश खुणावत होता. ते तिथलं ऐशोरामी जीवन लाथाडून स्वदेशात परतले. थेट गुजरातमधल्या आनंद इथं गेले. कायरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघटनेत सहभागी झाले. सरदार वल्लभभाई पटेल आणि त्रिभुवनदास पटेल या मोठ्या माणसांनी दूध क्रांतीचं स्वप्न पाहिलं. डेअरी स्थापन करून सामान्य माणसांना रोजगार देण्याचं, सहकारी चळवळ उभारण्याचं स्वप्न रंगवलं होतं. त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी कुरियन यांनी स्वतःला झुकून दिलं.

डेअरी संस्करण प्रकल्प सुरु झाला. त्यातून अमूलची निर्मिती झाली. अमुलचा प्रयोग यशस्वी झाला नंतर साऱ्या गुजरात राज्यात त्यांची पुनरावृत्ती झाली. सर्व दूध उत्पादक संघटना गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या नेतृत्वाखाली एकत्र केल्या. शेतकरी, शेतमजुरांच्या घरात पैसा यावा म्हणून सहकारी दूध व्यवसायाचा अभिनव प्रयोग साकारला गेला.

कुरियन यांनी या महासंघात आणि रुरल management  या संस्थेत १९७३ ते २००६ पर्यंत काम केलं. कुरियन यांच्या काळात देशाच्या दुग्धव्यवसायात क्रांतीच झाली. जगात फक्त गाईच्या दुधाची पावडर बनत असे. पण भारतात म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करण्याचा पहिला प्रयोग केला. तो यशस्वी झाला. अमूलचं यश बघून जय जवान, जय किसान ही घोषणा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांनी अमूलच्या धर्तीवर national डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था स्थापन केली . या संस्थेमार्फत ऑपरेशन फ्लड ही  योजना १९७० च्या सुमारास सुरु झाली त्यामुळे भारत जगातील मोठ्या दुध उत्पादक देशांपैकी एक बनला. ३३ वर्षे कुरियन national dairy बोर्डाचे अध्यक्ष होते. भारताची दूध खरेदी १९६०च्या दशकात २ कोटी मेट्रिक तन होती. ती २०११ मध्ये १२.२० कोटी मेट्रिक तन इतकी झाली. हा स्वप्नवत कायापालट झाला तो केवळ कुरियन यांच्यामुळेच. विशेष म्हणजे विकासाची साधनं सामान्य माणसाच्या हातात दिली तरच खरा विकास होतो हे या योजनेत स्पष्ट झालं. देशभर आणि जगभर कुरियन यांच्या कामाची वाहवा झाली.

भारताची मान जगात उंचावणाऱ्या कुरियन यांच्यावर सन्मानाचा अक्षरशः वर्षाव झाला. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा नागरी सन्मान देऊन गौरवलं. जागतिक अन्न पुरस्कार, Raman Magsese पुरस्कार, कार्नेगी- वॉटलेत जागतिक शांतता पुरस्कार, अमेरिकेचा International  Person of the year असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. मी भारतातल्या शेतकरयांचा कर्मचारी आहे अशी कुरियन बांधिलकी मानत म्हणूनच त्यांनी दूधाच्या महापुराचं स्वप्न पाहिलं. त्याचं महत्त्व भारताला, जगाला पटवून दिलं.

हे स्वप्नवत काम काही सहजासहजी झालं नाही. हा देश सर्व क्षेत्रात बलशाली व्हावा हे स्वप्न पं. नेहरू आणि त्यांच्या सहकारयांनी पाहिलं होतं. देशातल्या सामान्य दीन दुबळ्या माणसाचं ते स्वप्न होतं. या दुबळ्या मानसाच स्वप्न साकार करण्याच काम कुरियन यांनी केलं. आज खाजगीकरणाचा मोठा बोलबाला आहे. खाजगीकरणामुळे मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहतात. सरकारी प्रकल्प, सहकारी संस्थांचे उद्योग मोडून पडतात. त्याचं काही खरं नाही असा खाजगी उद्योगपतींच्या चेल्यांचा गाजावाजा असतो. सगळ्या समाजाला खाजगी करणातून सारं काही भव्य दिव्य, विकास-फिकास होतो हे सांगणारयाच्या तोंडात कुरियन यांचं काम थप्पड मारणारं आहे.

इंडिया विरुद्ध भारत हा संघर्ष आपल्या देशात जुना आहे. इंडियावाले खाजगीकरण,  जागतिकीकरण, मॉल, multinational , कंपन्यांचा झोक, बडेजाव यांनी भूललेत. भारतातले लोक आजही इंडियावाल्यांच्या कुकर्मांचे बळी म्हणून चिरडले जात आहेत. बळी म्हणून चिरडले जायचं नाही तर हातात हात घेऊन पुढं जायचं, आपलं नशीब आजमायचं हा मंत्र कुरियन यांनी गरिबांना दिला. गरिबांच्या घरात विकासाचा उजेड यावा हेच कुरियन यांचं खरं स्वप्न होतं. ते साकार करण्याचा प्रयत्न त्यांनी अमूल डेअरीच्या माध्यमातून केला.

म्हणून हा माणूस मोठा. ९ सप्टेंबरला आपल्यातून गेला. त्याचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आता आपली. कुरियन यांना भारतरत्न हा किताब जिवंतपणी मिळाला नाही हेही आपलं दुर्दैव. भारतरत्न मिलो न मिळो कुरियन भारताच्या लोकांचे रत्न होतेच.
त्यांना सलाम !


- राजा कांदळकर